Yogi Adityanath : ‘कॉंग्रेसने दलितांना हक्कांपासून वंचित ठेवले’; आंबेडकर मुद्द्यावरून योगींची टीका

Yogi Adityanath : उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाने अनेक जिल्ह्यांमध्ये निदर्शने करत गृहमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. बसपाची निदर्शने आणि विरोधकांच्या टीकेवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.
स्वातंत्र्याच्या काळात आणि स्वतंत्र भारतात आंबेडकरजींचे मोठे योगदान आहे. सामाजिक अडचणींचा सामना करत त्यांनी अभ्यास केला आणि त्यातूनच त्यांनी आपली सर्व शक्ती भारतासाठी लावली. राज्यघटनेचे शिल्पकार या नात्याने सर्वांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर असल्याचे योगी म्हणाले.
काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून वेळोवेळी बाबासाहेब आंबेडकरांचा अनैतिक आणि असंवैधानिक आचरणातून अपमान केला. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि संविधान निर्मितीमध्ये मोठे योगदान आहे. आंबेडकरांनी अर्थव्यवस्था आणि कायद्याच्या क्षेत्रात नावलौकिक मिळवला आणि भारताला ज्ञानाने उजळून टाकले.
अटलजींचे सरकार असो किंवा पीएम मोदींच्या नेतृत्वातील सरकार असो, बाबासाहेबांचा नेहमीच आदर केला जातो आणि त्यांच्या विचारांचे प्रतिनिधित्व केले जाते. बाबासाहेबांच्या पंचतीर्थच्या विकासाचे काम भाजप सरकारांनी केले आहे.
बाबासाहेबांनी शिक्षण घेतलेल्या इंग्लंडमध्ये त्यांचे स्मारकही बांधण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हे भाजपने बांधले आणि भारतातील वंचित आणि दलितांना आदर दिला. मुख्यमंत्री म्हणाले की, दुसरीकडे देशातील दलितांचा अपमान करण्याचा इतिहास असलेल्या काँग्रेसने तुष्टीकरणामुळे दलितांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले आहे.
पंडित नेहरूंना आंबेडकर संविधान सभेचा भाग व्हावेत अशी इच्छा नव्हती. काँग्रेसला बाबासाहेबांना मसुदा समितीचे सदस्य बनवायचे नव्हते. बाबासाहेबांनी संसदेत पोहोचावे असे काँग्रेसला कधीच वाटले नाही. काँग्रेसने बाबासाहेबांचे स्मारक होऊ दिले नाही.
काँग्रेसला दलितांची चिंता नाही, फक्त मुस्लिमांची काळजी आहे. काँग्रेस सरकारमध्ये देशातील साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे, असे पंतप्रधान म्हणायचे. दलितांना अधिकार नाहीत का? असा सवाल योगींनी केला.





