सातारा – राज्यातील नव्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईत सुरू असतानाच साताऱ्यात एका माथेफिरूने प्रशासन आणि पोलिस दलाला काही काळ तणावात ठेवले. सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास शासकीय विश्रामगृहात जाऊन त्याने सुरक्षारक्षकाला “माझ्या अंगाला बॉम्ब लावले आहेत,” असे सांगून गोंधळ माजवला. काही मिनिटांतच सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, हा माथेफिरू मनोरुग्ण असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. शपथविधीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर हाय अलर्ट देण्यात आला होता. अशा स्थितीत विश्रामगृहात “बॉम्ब” असल्याचा दावा उघड झाल्याने साताऱ्यात एकच खळबळ उडाली. माथेफिरूने सुरक्षारक्षकाला धमकी देत, “माझ्या अंगावर बॉम्ब आहे, हे संपूर्ण विश्रामगृह उडवून देणार,” असे सांगितले. ही माहिती मिळताच सुरक्षारक्षकाने सातारा जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. अवघ्या काही मिनिटांत बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वानपथक, अग्निशमन दल, वाहतूक शाखा, रुग्णवाहिका आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवर माथेफिरूने धमक्या देण्यास सुरुवात केली. “माझ्या अंगाला हात लावल्यास अर्थिंग होईल,” असे तो वारंवार सांगत होता. मात्र, त्याचे वर्तन पाहून तो मनोरुग्ण असल्याचा पोलिसांना संशय आला. त्याला शांत करण्यासाठी पोलिसांनी गोड बोलून त्याच्याशी संवाद साधला. अखेरीस त्याला रुग्णवाहिकेत बसवून उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरात घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि रात्री उशिरापर्यंत यावर चर्चा सुरू होती. प्रशासन आणि पोलिस दलाने या प्रकाराला तातडीने हाताळत संभाव्य अनर्थ टाळला.