Satara: 22 महसूल मंडलांमध्ये 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस जिल्हाधिकारी संतोष पाटील; कोयना धरणासह सर्व धरणांतील पाणीसाठ्यात वाढ
Satara जिल्ह्यात आजअखेर 288.7 मिलिमीटर पर्जन्यमान झाले असून पावसामुळे नदी, नाले, ओढे दुथडी भरुन वाहत आहेत. जिल्ह्यात आज दि. ७ रोजी 22 महसूल मंडळांमध्ये 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पर्जन्यमान झाले आहे.

Satara: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा वाढला आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाची क्षमता 105.25 टीएमसी असून यामध्ये आज सकाळी 10 वाजेपर्यंत 35.71 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण 33.93 टक्के भरले असून धरणातील आवक 93 हजार क्युसेकने होत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. जिल्ह्यात आज दि. ७ रोजी 22 महसूल मंडळांमध्ये 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पर्जन्यमान झाले आहे, से त्यांनी सागितले.
जिल्ह्यात आजअखेर 288.7 मिलिमीटर पर्जन्यमान झाले असून पावसामुळे नदी, नाले, ओढे दुथडी भरुन वाहत आहेत. जिल्ह्यात आज दि. ७ रोजी 22 महसूल मंडळांमध्ये 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पर्जन्यमान झाले आहे. यामध्ये महाबळेश्वर महसूल मंडळामध्ये सर्वाधिक म्हणजेच 392.8 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्याखालोखाल लामज, बामणोली, तापोळा या महसूली मंडळांमध्ये 169 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर वाठार 148.5 मिलिमीटर, करहर आणि केळघर या दोन ठिकाणी 124.5 मिलिमीटर, पाचगणी 136.5 मिलिमीटर, पसरणी 110.3 मिलिमीटर, पाटण 100.5 मिलिमीटर असा पाऊस झाला आहे.
सातारा तालुक्यातील कारी येथील प्राथमिक शाळेचे पत्रे उडाल्यामुळे तर खंडाळा तालुक्यातील मिरजे येथील प्राथमिक शाळा व स्मशानभूमीचे भिंत पडून नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सखोल भागात पाण्या साचणाऱ्या, धबबधेच्या ठिकाणी निर्बंध घालण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्यातील धरणांची सद्यस्थिती पुढील प्रमाणे. आजचा एकूण पाणीसाठा, कंसात प्रकल्पाची एकूण क्षमता टीएमसीमध्ये आणि आजची एकूण टक्केवारी.
कोयना 35.71 (105.25) 33.93 टक्के, धोम 6.59 (13.5) 48.81 टक्के, धोम बलकवडी 2.17 (4.08) 53.19 टक्के, कण्हेर 6.29 (10.10) 62.28 टक्के, उरमोडी 4.50 (9.96) 45.18 टक्के, तारळी 1.73 (5.85) 29.57 टक्के.
पावसामुळे झाड कोसळणे, दरड कोसळणे, रस्ता खचणे असे प्रकार होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अशा वेळी यंत्रणांनी सजग राहून तात्काळ कार्यवाही करावी व रस्ते वाहतुकीसाठी खुले करावेत. धोकादायक ठिकाणी दरड प्रवण क्षेत्रांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी पाटील यांनी दिले आहेत.
९० जणांचे स्थलांतर व ८३ घरांची पडझड
महाबळेश्वर तालुक्यातील नावली येथील 7, धावली येथील 17 आणि रुळे येथील 8 अशा एकूण 32 जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. जावळी तालुक्यातील बाहुळे येथील 23 आणि बोंडारवाडी येथील 8 अशा 31, वाई तालुक्यातील जांभळी येथील 22 आणि डोईचीवाडी येथील 5 नागरिकांचे अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, नातेवाइक, मंदिरे आदी सुरक्षित ठिकाणी तात्पुरते स्थलांतरण करण्यात आले आहे, शी माहिती त्यांनी दिली. पाटण तालुक्यातील 39, सातारा तालुक्यातील 9, खंडाळा तालुक्यातील 2, जावशी तालुक्यातील 11, वाई तालुक्यातील 13, महाबळेश्वर तालुक्यातील 9 अशा 83 घरांची पडझड झाली आहे. या घरांच्या पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत.





