एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिली का? देवेंद्र फडणवीस म्हणाले,’ एखादी चूक होत असेल तर…’

Devendra Fadnavis | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती देण्यात आल्याची चर्चा आहे. नुकतेच माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या काळात दिलेले 3200 कोटी रुपयांचे काम रद्द करण्यात आले. त्यामुळे शिंदेंच्या कार्यकाळातील अनेक निर्णय फडणवीस सरकारकडून बदलले जात असल्याची चर्चा रंगली आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आपण कोणत्याही कामांना स्थगिती दिली नसल्याचे म्हटले आहे. सोबतच, जिथे एखादी चूक होत आहे असे लक्षात आले तर नक्कीच स्थगिती देण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका देखील त्यांनी मांडली.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्यात आली का? असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, रोज मला अशी बातमी ऐकायला मिळते की कामाला स्थगिती दिली. अलीकडच्या काळात एखाद्या आमदाराने पत्र दिले आणि आपण स्थगिती दिली असे झालेले नाही. आपल्याला स्थगिती द्यायची म्हणजे दुसरी बाजू आल्याशिवाय आपण स्थगिती देत नाही. आवश्यकता पडली तर ज्या मंत्र्यांचे खातं असणार त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल.
कोणत्याही आमदाराने निवेदन दिल्यानंतर त्यामध्ये त्यांनी काही मागणी केली असेल किंवा एखादा आरोप जरी केला असेल तरी आम्ही तपासून कारवाई करतो असं लिहितो. आम्ही कधी दूर्लक्ष करत नाहीत.’ असेही ते म्हणाले.
तसेच, राज्य सरकारकडून तत्कालीन शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागाच्या 3 हजार 200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आरोग्य विभागाच्या बातमीबाबत बोलायचे झाले तर, ती फाईल मी पाहिलीच नाही. चूक असेल तर स्थगिती देईन.
‘आरोग्य विभागासाठी केंद्राने निधी दिला होता. त्यातील 9 टक्के निधी हा भांडवली खर्चासाठी वापरण्यात आला. मात्र, केंद्राचे निर्देश होते की 5 टक्केच निधी त्यासाठी खर्च करावा. त्यामुळं अधिकाऱ्यांनी काही निर्णय घेऊन काही काम थांबवे. हा विषय माझ्याकडे येण्याचा प्रश्नच येत नाही.’, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी ‘जिथे एखादी चूक होत आहे असं लक्षात आलं तर मी नक्कीच स्थगिती देईल. आवश्यकता पडली तर मी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करेल.’ असेही ते म्हणाले.





