Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी ! तिघांचा मृत्यू, सरकारी शाळा, रस्ते, घरे गेली वाहून

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये काही दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसाचा फटका अनेक नागरिकांना बसला असून, ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसामुळे जम्मू-काश्मीरच्या रामबनमध्ये पूर आला असून, यात तीन जणांचा मृत्यू झाला. ढगफुटीमुळे अचानक पूर आल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या बचावकार्य सुरू आहे.
अचानक आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाच्या परिस्थितीमुळे रामबन जिल्ह्यात परिस्थिती बिकट झाली आहे. दोन हॉटेल्स, काही दुकाने आणि काही घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहेत.
तसेच रामबन जिल्ह्यातील चिनाब नदीजवळील धर्मकुंड गावात भूस्खलन झाले असून, १० घरे पूर्णपणे खराब झाली असून, २५ ते ३० घरांचे नुकसान झाले आहे. तर ढगफुटीनंतर बचाव पथकाकडून बचावकार्य सुरू असून, १०० नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे. तर, तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तसेच आतपर्यंत ५०० जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या मते, जम्मू आणि काश्मीरमध्ये पुढील दोन ते तीन दिवस पाऊस सुरु राहण्याची शक्यता आहे. विशेषतः डोंगराळ आणि उंच भागात गडगडाटी वादळासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रामबन, उधमपूर, पुंछ आणि बारामुल्ला जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच येथील लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरमधील रामबनमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या घटनेने मला खूप दुःख झाले आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना पीडित कुटुंबांसोबत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ते स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहेत जेणेकरून मदत आणि बचाव कार्य त्वरित पार पाडता येईल, असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले.
अनेक ठिकाणी भुस्खलन
दुसरीकडे, रामबन जिल्ह्यातील बनिहाल परिसरात अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. शेकडो वाहने अडकली आहेत. किश्तवार-पद्दर रस्ता देखील बंद आहे.
येथे वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. भूस्खलनाचे काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये डोंगरावरून ढिगारा पडताना दिसत आहे. काही भागात, डोंगराचा ढिगारा रस्ते आणि निवासी भागात पोहोचला आहे.





