Pune District : दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष
Pune District : यामुळे थेट आरोग्यावर परिणाम होत असून लहान मुले आणि वृद्धांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. शुद्ध पाण्यासाठी लोकांना जारचे पाणी विकत घ्यावे लागत असून सर्वसामान्यांवर आर्थिक भुर्दंड पडत आहे.

भिगवण : गाळ मिश्रित आणि दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, परिसरात विविध आजारांची भीती निर्माण झाली आहे. गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून नळांना गाळ मिश्रित,पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
हे दूषित पाणी पिल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार असून परिसरात गॅस्ट्रो, डायरिया,आणि पोटाच्या विकारांचे रुग्ण वेगाने वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. जलवाहिनीतील गळती किंवा पाणीपुरवठा यंत्रणेतील बिघाडामुळे नळांना थेट मैला युक्त आणि गाळ मिश्रित पाणी येत आहे. यामुळे थेट आरोग्यावर परिणाम होत असून लहान मुले आणि वृद्धांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. शुद्ध पाण्यासाठी लोकांना जारचे पाणी विकत घ्यावे लागत असून सर्वसामान्यांवर आर्थिक भुर्दंड पडत आहे.
स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार तोंडी तक्रारी केल्या आहेत. परंतु, प्रशासनाकडून केवळ ‘दुरुस्ती सुरू आहे’ असे आश्वासन दिले जात आहे. अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिक आता आंदोलनाचा पावित्र्यात असल्याचे समजत आहे.
दरम्यान प्रशासनाने तात्काळ पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची तपासणी करून मुख्य जलवाहिन्या फुटल्या आहेत का, याची शोधमोहीम घेऊन दुरुस्ती करावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच नागरिकांना नियमितपणे स्वच्छ आणि शुद्ध पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.
याबाबत ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, थेट नदीवरून (डीकसळ येथील) पाणी उचलल्याने गढूळ पाणी येत असावे त्यामध्ये टी.सी.एल टाकून काही उपाययोजना करता येतात का ते बघू.असे सांगितले.





