Child Marriage: ऐन लग्नमंडपात पोलिसांची धाड! १५ वर्षांच्या मुलीचा बालविवाह रोखला, पुढे काय घडले?
Child Marriage: रहिमतपूर हद्दीतील मंदिरातून अल्पवयीन मुलीची सुटका; वयाची पडताळणी करताच बालविवाहाचा डाव उघड.

Child Marriage – एका अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर विवाह रहीमतपूर पोलीस आणि बालकल्याण समितीच्या सदस्यांच्या सतर्कतेमुळे वेळेत रोखण्यात आला. रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावाबाहेरील मंदिरात हा विवाह सोहळा होणार होता. मात्र, पोलिसांनी अत्यंत वेगाने कारवाई करत, या मुलीला कायद्याचे संरक्षण मिळवून दिले.
रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांना शुक्रवारी (दि. 26) मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने वेगाने हालचाली करत, नियोजित विवाहस्थळी धाड टाकली. त्या ठिकाणी विवाहाची तयारी सुरू होती. 25 ते 30 जण उपस्थित होते. पोलिसांनी मुलीच्या अधिकृत कागदपत्रांची पडताळणी केली असता, त्या मुलीचे वय 15 वर्षे तीन महिने) असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर पोलिसांनी कोरेगाव येथील बालविकास प्रकल्प अधिकारी शारदा जाधव आणि ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीने त्या मुलीला विश्वासात घेऊन, तिच्या नातेवाइकांसह पोलीस ठाण्यात आणण्यात आले. शारदा जाधव यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे, त्या मुलीला सातारा जिल्हा बालकल्याण समितीसमोर तात्काळ हजर करण्यात आले. बालकल्याण समितीने दिलेल्या आदेशानुसार त्या मुलीला सुरक्षित वातावरणात ठेवून, तिचे पुढील शिक्षण, पुनर्वसन व समुपदेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
आपल्या परिसरात बालविवाह होत असल्याची किंवा ठरत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी संबंधित पोलीस ठाणे किंवा चाईल्डलाईनच्या 1098 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणार्याचे गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन करण्यात आले आहे. सपोनि विनोद नेवसे, पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, हवालदार प्रवीण बर्गे, शंकर घाडगे, महेश शेडगे, सुशांत शिंदे, शीतल सानप, समाधान देशमुख, संजय सपकाळ, तुषार काळंगे, अश्विनी घाडगे, शुभांगी पाटोळे, अर्पिता गायकवाड, बालविकास प्रकल्प अधिकारी शारदा जाधव यांनी ही कामगिरी केली.





