Chhatrapati Sambhaji Maharaj : औरंगजेबाने शंभूराजेंना मनुस्मृतीप्रमाणे मारलं; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने केला खळबळजनक दावा

नागपूर : काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) पराक्रमाची गाथा सांगणारा ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एकीकडे छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) पराक्रमाचा गौरव करण्यात आला तर दुसरीकडे औरंगजेबचा क्रूर इतिहास पुन्हा चर्चेत आला. यानंतर औरंगजेबच्या कबरीवरुन महाराष्ट्रात वाद पेटला. हा वाद एवढा वाढला कि त्यावरून नागपूरचा हिंसाचार घडला. हे प्रकरण शांत होत असताना आता काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने एक खळबळजनक दावा केला आहे.
काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने केला खळबळजनक दावा
नागपूर हिंसाचार प्रकरणी परिस्थितीची पाहणी करायला आलेले काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.औरंगजेबाने शंभूराजेंना मनुस्मृतीप्रमाणे मारलं असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केला आहे. ‘मारण्याची पद्धत पंडितांनी औरंगजेबाला सांगितली असं म्हणत इतिहासातील वस्तूस्थिती दुर्लक्षित करता येणार नाही असंही दलवाई म्हणाले. हुसेन दलवाई यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा : Nagpur Violence : नागपूर दंगलीचे बांगलादेश कनेक्शन? ‘ती’ फेसबुक पोस्ट पोलिसांच्या हाती
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरा औरंगजेबाचाही इतिहासही वाचावा. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) हत्या केली ती क्रुरता होती. ही बाब देवेंद्र फडणवीस मान्य करतील का? असा सवालदेखील हुसेन दलवाई यांनी उपस्थित केला.
हुसेन दलवाई यांनी केला आरोप
महाराष्ट्रात अशा पद्धतीचे वातावरण कधीही नव्हते. महाराष्ट्रात नेहमीच सर्व धर्मांचे एकोप्याचे नातं राहिलेले आहे. अनेक सणांमध्ये हिंदू मुस्लिम एकत्र येतात. सरकारने जाणीवपूर्वक काही लोकांना मदत करते. मला वाटते ते चुकीचं आहे. सकाळी ज्यांनी आंदोलन केले त्यांना काहीच नाही ज्यांनी रात्री आंदोलन केले त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असा आरोप हुसेन दलवाई यांनी केला. तसेच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलास आंदोलनाची परवानगी द्यायला नको होती. पोलिसांची कारवाई एकतर्फी होती. झालेली घटना दुर्देवी होती. पोलिसांनी संयम बाळगायला हवा होता असेदेखील हुसेन दलवाई म्हणाले आहेत.
पोलिसांची मोठी कारवाई
नागपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि युट्यूबर मोहम्मद शहजाद खान यांना अटक केली आहे. सोशल मीडियाद्वारे हिंसाचार घडवण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या अटकेमुळे सोशल मीडियाद्वारे दिशाभूल करणारा प्रचार करणाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
नागपूर पोलिस आणि सायबर सेल या प्रकरणात अधिक पुरावे गोळा करत आहेत जेणेकरून हिंसाचारात सहभागी असलेल्या इतर संशयितांना अटक करता येईल. सोशल मीडियावर प्रक्षोभक विधाने करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे आणि अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर, नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या किंवा भडकाऊ संदेश टाळण्याचे आणि अफवा पसरवणाऱ्यांबद्दल प्रशासनाला तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले जात आहे.





