Chhagan Bhujbal : “वाह रे दादाचा वादा, माझी किंमत नसेल…”; छगन भुजबळ अजित पवारांवर भडकले, बैठकीत नेमकं काय घडलं?

Chhagan Bhujbal : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार नुकताच (दि. 15 डिसेंबर) नागपूर येथे पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिली मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपच्या सर्वाधिक 19, शिवसेना (शिंदे गट) 11 तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, बाबासाहेब पाटील, इंद्रनील नाईक या नेत्यांनी शपथ घेतली.
परंतु, मंत्र्यांच्या या यादीत छगन भुजबळ यांना डच्चू देण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांचंही नाव नव्हतं. मात्र ऐनवेळी धनंजय मुंडे यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. यावरून आता नवं राजकारण सुरु असल्याचं महाराष्ट्रात दिसून येत आहे. दरम्यान, मंत्रीपदापासून दूर ठेवणाऱ्या छगन भुजबळ यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. आपण कार्यकर्त्यांशी नाशिक येथे बोलल्यानंतर पुढचा निर्णय घेणार असल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेले आहे. त्यांनी येवला येथे बैठक घेऊन आपल्या मनातील खदखद सर्वासमोर मांडली आहे
“कसला वादा, अन् कसला दादा..”; भुजबळांचा पवारांवर संताप
आठ दिवसांपूर्वी समीर भुजबळांना पटेल, तटकरे यांनी बोलवले. नितीन पाटील यांचा राजीनामा घेवून भुजबळ साहेबांना राज्यसभेवर पाठवू, असे सांगितले. मकरंद पाटील यास मंत्रिपद द्यायचे अन् त्याच्या भावाला खाली बोलवायचे. हा काय पोरखेळ आहे का? लोकांनी मला निवडून दिले, त्यांना मी काय तोंड काय देवू.
त्यांना भुजबळांचा बळी घ्यायचा होता का? छगन भुजबळ काय लल्लू पाटील आहे का? हा काही पोरखेळ आहे का? माझ्या मनात मंत्री पदाची शंका होती, अन् त्याप्रमाणे झाले. माझी जर किंमत होत नसेल तर काय उपयोग? दादाचा वादा. वाह रे दादाचा वादा, कसला वादा, अन् कसला दादा, असे म्हणत छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केलाय.
लोक दाऊदचं नाव घ्यायला घाबरत होते….
ते पुढे म्हणाले, “आपण सुरुवातीलाच महसूल मंत्री झालो होतो. आता महसुलमंत्री पदावरुन पक्षांमध्ये भांडणं सुरू आहेत असे भुजबळ यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की विरोधी पक्षनेता झालो त्यावेळी पवारांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम केले होते. 1999 साली जर काँग्रेस एकत्र असती तर मी 100 टक्के मुख्यमंत्री झालो असतो असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हा कोणाचा पत्ता नव्हता फक्त मी आणि पवार साहेब होतो. जेव्हा मुंबई दहशतखाली होती, लोक दाऊदचं नाव घ्यायला घाबरत होते. तेव्हा मी गृहमंत्री झालो होतो. अमिताभ बच्चन, शाहरुख मुंबई सोडून जाणार होते मी त्यांना थांबवलं आणि मुंबईतली दहशत संपवली असेही भुजबळ यांनी सांगितले.





