Chandrashekhar Bawankule : आताच मतदार याद्या तपासून घ्या.! चंद्रशेखर बावनकुळेंकडून कॉंग्रेसला चिमटा
Chandrashekhar Bawankule – मतदार याद्यांच्या काँग्रेसच्या आरोपावर महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस वर हल्ला चढवला आहे. आगामी काही महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभा निवडणुका ज्या मतदार याद्यांवर झाल्या त्यावरच होणार आहेत.
त्यामुळे काँग्रेस नेत्यांचे काही आक्षेप असतील तर ते त्यांनी आत्ताच निवडणूक आयोगाकडे मांडावे. मतदार याद्या तपासाव्या. निवडणूक हरल्यानंतर अपयशाचे खापर मतदार यादीवर फोडू नये, असा टोला बावनकुळेंनी विरोधकांना लगावला आहे.
नागपूरमध्ये पालकमंत्री बावनकुळे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, निवडणुकीच्या काळात मतदार याद्या जाहीर होतात. त्यावेळी सर्वच पक्षांना आक्षेप घेण्यासाठी वेळ दिला जातो. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एक लाख बुथवर याद्या लावल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याने आक्षेप घेतला नाही. निवडणुकीच्या काळातही आक्षेप घेतले नाही.
मात्र, निवडणुका झाल्यावर सात महिन्यानंतर राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला. महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आले. तेव्हा कुठलाही आक्षेप त्यांनी घेतला नाही, त्यावेळी मतदार याद्या बरोबर होत्या. ज्या ठिकाणी भाजप निवडून येते त्याच ठिकाणी काँग्रेस पक्षाला आक्षेप असतो, असे म्हणताना त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.
आम्हाला आमच्या अडीच लाख लाडक्या बहिणींनी मतदान केले, ४५ लाख शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केले, त्यांनी आम्हाला मतदान केले. तसेच कामठी विधानसभा मतदानसंघामध्ये १७ हजार बूथ लावून आम्ही नवीन मतदार नोंदणी केली. त्यात ३४ हजार मतदार वाढले.
मतांची वाढ होणे म्हणजे मतदार यादी चुकीची आहे असे होत नाही. त्यामुळे राहुल गांधींना आवाहन आहे की, त्यांना शंका असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदार याद्या तपासून घ्याव्या, यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील त्यांच्या कार्यकर्त्यांना कामाला लावावे असा सल्लाही त्यांनी दिला.
धक्का बसणार नाही याची काळजी घ्या
आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मी स्वत: राज्यात फिरणार आहोत. सर्वांना निवडणूक महायुतीतच लढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मात्र, जिथे शक्य नसेल तिथे लढत मैत्रीपूर्ण लढती होतील, तेथे महायुतीला धक्का बसणार नाही याची काळजी घ्या, अशा सुचना देखील स्थानिक नेत्यांना देण्यात आल्या असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.





