चंद्रपूर – राज्यासह चंद्रपूर जिल्हा सध्या होरपळून निघत आहे. मागील काही दिवसांपासून सूर्य अक्षरशः आग ओकत असून पार ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. चंद्रपूरमध्ये सोमवारी ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, ते राज्यातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने तीन दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला असून नागरिकांना बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेलया माहितीनुसार, विदर्भातील ११ शहरांमध्ये ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले आहे. यामध्ये चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ४५.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील एक-दोन ठिकाणी २४ एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ब्रम्हपुरी तहसीलमध्ये ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आणि ते विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उष्ण शहर ठरले आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून चंद्रपुरातील तापमानात वाढ होऊ लागली आहे. सलग तीन दिवस चंद्रपूरमधील तापमान 40 पेक्षा जास्त आहे. तापमानाच्या वाढीमुळे अगदी सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत आहेत. अनेक जण दुपारी बाहेर निघणे टाळत असल्याने रस्त्यावरही रहदारी कमी झाल्याचे दिसून येत आहे. दुपारीच नव्हे, तर रात्री आणि पहाटेही हवेत चांगलाच उकाडा जाणवतो आहे. विदर्भ, मराठवाड्यात व मध्य महाराष्ट्रात तापमान चाळीशीच्या मागेपुढे झुलत होते. उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भ होरपळत आहे.