Sharad Pawar : भाजपसोबत गेलेल्या संधीसाधूंना सोबत घेऊ शकत नाही, शरद पवारांचं मोठं विधान; युतीच्या चर्चेला ब्रेक?

पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी (17 जून 2025) पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमात अजित पवार यांच्या गटाला लक्ष्य करत धक्कादायक वक्तव्य केले. “सत्तेसाठी भाजपसोबत (BJP) गेलेल्या संधीसाधूंना आपण सोबत घेऊ शकत नाही.
गांधी, नेहरू, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे लोक सोबत घेऊ, पण काँग्रेसचा विचार भाजपशी सुसंगत नाही,” असे पवार म्हणाले. या वक्तव्यामुळे अजित पवार गटासोबतच्या युतीच्या चर्चांना ब्रेक लागला असून, पक्षांतर्गत एकसंघतेच्या आशांवर पाणी फिरले आहे.
नव्या नेतृत्वाची गरज
शरद पवार यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी नव्या नेतृत्वाची फळी तयार करण्यावर भर दिला. “विकास असा करायचा की भावी पिढी प्रेरित व्हावी. जे गेले त्यांची चिंता करू नका. माझ्या कारकिर्दीत अनेकांनी साथ सोडली, पण कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने मी सत्तेत परतलो.
लोकशाही जनतेच्या शहाणपणाने टिकली आहे आणि ती पुढेही टिकेल,” असे ते म्हणाले. त्यांनी कार्यकर्त्यांना धीर देत, “निवडणुकीची काळजी करू नका. जो आपल्या विचारांशी जोडला असेल, त्याला संधी मिळेल,” असे आश्वासन दिले.
पिंपरी-चिंचवडचा विकास आणि प्रदूषण
पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक प्रगतीवर बोलताना पवार म्हणाले, “यशवंतराव चव्हाण, अण्णासाहेब मगर आणि रामकृष्ण मोरे यांनी या शहराचा चेहरा बदलला. रांजणगाव, चाकण, बारामती येथे औद्योगिक पट्टे निर्माण केले. पण आता प्रदूषण आणि नद्यांवरील फेस हे चिंतेचे विषय आहेत. हे प्रश्न फक्त राष्ट्रवादी सोडवू शकते.”
तसेच, “जुनी अनधिकृत बांधकामे टिकायला हवीत, पण नवीन होऊ देऊ नका. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढणारा व्यवसाय स्वच्छ करावा लागेल,” असेही त्यांनी सुचवले. या वक्तव्यांनी पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण तापले असून, अजित पवार गट आणि शरद पवार यांच्यातील दरी आणखी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.




