माधुरी तळवलकर
डायमंड पब्लिकेशन्सने प्रश्न पुरुषभानाचे नावाचे एक महत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. यात प्रामुख्याने स्त्रीवादी पुरुषांचे अनुभव कथन आणि त्यावर त्यांनी केलेले चिंतन असे लेख आहेत. पुरुष स्त्रीवादी असू शकतात का? स्त्रीमुक्ती चळवळीमध्ये त्यांची भूमिका काय राहील? असे प्रश्न आपल्याला पडतात, तेव्हा त्याची उत्तरे या पुरुषांनी लिहिलेल्या लेखातून आपल्याला मिळतात.
मध्यंतरी एका स्त्रीवादी पुरुषाने एका कॉन्फरन्सचा अनुभव सांगितला. एका संशोधकाने आपल्या निबंधाचे वाचन संपवताना एक काहीसा लैंगिक वाटणारा विनोद केला. त्याचा निषेध म्हणून एका स्त्रीवादी महिलेने आवाज उठवला व त्या पुरुषाने माफी मागावी अशी मागणी केली. त्याबरोबर बाकीचे सगळेजण त्या स्त्रीची समजूत घालू लागले. हा विनोद होता, स्त्रीचा मुद्दाम अपमान करावा असा त्यामागे हेतू नव्हता, सोडून द्यायचं… असे तिला सल्ले दिले जाऊ लागले. तेव्हा हा जो स्त्रीवादी पुरुष होता, तो उठला. या विनोदामध्ये स्त्रीत्वाचा अपमान करणारा उल्लेख आहे, असे सांगून त्याचे गांभीर्य इतरांच्या लक्षात त्याने आणून दिले. त्याचे म्हणणे मात्र सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतले व त्या वक्त्यानेही माफी मागितली. यावरून असं लक्षात येतं की, बाई कितीही खरं बोलत असली, तर्कशुद्ध रीतीने तिचे म्हणणे मांडत असली, तरीसुद्धा तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याची आपल्या समाजाची वृत्ती आहे. पुरुषाचे मात्र साधे बोलणेसुद्धा गांभीर्याने व महत्त्व देऊन ऐकले जाते.
या पुस्तकाचा हाच उद्देश दिसतो. स्त्रिया आपली बाजू मांडत आहेतच. स्त्री-पुरुष असमानतेमधला अन्याय, अनैसर्गिकपणा आणि त्यातून स्त्रीपुरुषांचे, समाजाचे व देशाचे होणारे नुकसान त्या सातत्याने लक्षात आणून देत आहेत. अर्थात कोणावरही अन्याय होऊ नये व समाज निकोप व्हावा असे मानणारे काही पुरुषही आहेत. त्यांचे अनुभव, विचार या पुस्तकात ग्रथित केले आहेत.
हरीश सदानी, डॉ. गीताली वि. मं., मुकुंद किर्दत आणि डॉ. रवींद्र रु. पंढरीनाथ असे या पुस्तकाचे एकूण चार संपादक आहेत. विशेष हे की, या पुस्तकातील सर्व लेख अगदी सुटसुटीत आणि वाचनीय आहेत. मुंबईच्या टाटा समाजविज्ञान संस्थेतील प्राध्यापक व स्त्रीवादाच्या अभ्यासक डॉ. छाया दातार यांनी या पुस्तकास अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. त्या लिहितात, “एका अर्थाने स्त्रीवादी पुरुषांना समतोल साधण्यासाठी सतत तारेवरची कसरत करावी लागणार आहे.’
यातील लेख रोचक व नवीन दृष्टी देणारे आहेत. शिवाय या पुस्तकात पाच कथांचाही समावेश आहे. संजीव लाटकर यांची “ठिपका’ नावाची कथा अगदी वेगळी आणि अर्थपूर्ण आहे. थोडक्यात, ज्यांना कुणाला काहीतरी वेगळे समजावून घ्यायचे आहे आणि तरीही बोअर व्हायचे नाहीय, अशांनी… विशेषतः पुरुषांनी हे पुस्तक जरूर वाचायला हवे.