Top 10 News : बॉलिवूडही तुकाराम मुंढेंच्या रडारवर ते कांबळीच्या आयुष्यावर येणार बायोपिक…; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या
Top 10 News : बॉलिवूडही तुकाराम मुंढेंच्या रडारवर ते कांबळीच्या आयुष्यावर येणार बायोपिक...; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

Top 10 News : १) महाराष्ट्र्रासह अनेक राज्यांमध्ये उद्या मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा
महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये सोमवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. भारतीय हवामान विभागाने कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलीय. घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. याशिवाय उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि ईशान्य भारतातील काही भागांतही मुसळधार पावसाची शक्यता आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात पुढील काही दिवस कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेय. (Top 10 News)
२) एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत; शिवसेना महिला खासदाराचा दावा
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी राज्यातील कोट्यवधी भगिनींची इच्छा असल्याचा दावा शिवसेना खासदार ज्योती वाघमारे यांनी केलाय. नांदेड दौऱ्यावर असताना त्यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं. शिंदे हे महाराष्ट्रातील सर्वात सहज उपलब्ध असलेले उपमुख्यमंत्री असून, त्यांनी सामान्य माणसाचा मुख्यमंत्री कसा असतो, हे दाखवून दिलं, असं वाघमारे म्हणाल्या. दरम्यान, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना त्यांच्या या विधानामुळे महायुतीत पुन्हा चर्चांना उधाण आलंय. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटालाच खरी शिवसेना मानल्याचा दावा वाघमारे यांनी केलाय. तसेच सुप्रीम कोर्टातील सुनावणीत त्यांच्या वकिलांकडून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रभावीपणे दिलं जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. (Top 10 News)
३) आता बॉलिवूडही तुकाराम मुंढेंच्या रडारवर! शाहरूख खानसह 3 बड्या सुपरस्टार्सना धाडली नोटीस
अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा फटका आता बॉलिवूड कलाकारांनाही बसलाय. FDAने अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती आहे. तिघांनी केलेल्या ‘इलायची’च्या जाहिरातीवरून ही कारवाई करण्यात आलीय. या जाहिरातीच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे पान मसाल्याची जाहिरात केली जात असल्याचा FDAचा आरोप आहे. महाराष्ट्रात पान मसाल्याच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर १३ जुलै २०२६ पासून एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे प्रतिबंधित उत्पादनाशी संबंधित जाहिरातींवरही FDAचे लक्ष आहे. जाहिरातीतील ब्रँडचं नाव, संवाद आणि सादरीकरणामुळे पान मसाल्याचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. आता तिन्ही कलाकारांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलं असून, त्यांच्या उत्तरानंतर पुढील कारवाईचा निर्णय होणार आहे. (Top 10 News)
४) जॅमर न काढल्याने चालकाने स्वत:ची Skoda पेटवली; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ
छत्रपती संभाजीनगरमध्ये जॅमर न काढल्याच्या संतापातून चालकाने स्वतःचीच Skoda पेटवल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या कारला नो-पार्किंगच्या कारणावरून पोलिसांनी जॅमर लावला होता. चालक घटनास्थळी आल्यानंतर त्याने जॅमर काढण्यासाठी पोलीस आणि संबंधित कर्मचाऱ्यांकडे वारंवार विनंती केल्याचा दावा आहे. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने तो संतापला आणि त्याने चक्क स्वतःच्या कारला आग लावली. काही क्षणांतच कारने पेट घेतल्याने रस्त्यावर धुराचे लोट आणि आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसू लागल्या. घटना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, चालकाने एवढं टोकाचं पाऊल का उचललं आणि जॅमर काढण्याबाबत नेमकं काय घडलं, याचा तपास प्रशासनाकडून केला जात आहे. (Top 10 News)
५) ट्रम्पमुळे लोकांची दारू पिण्याची क्षमता वाढली : सुजय विखे
ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका करताना भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी पुन्हा एकदा अजब विधान केलंय. शिर्डीत बोलताना त्यांनी भारतातील क्रूड ऑइलच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचा दावा केला. त्याचा फटका नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला बसल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं. क्रूड ऑइलच्या पुरवठ्यात सुमारे ५० टक्के घट झाल्याने डांबराच्या उत्पादनावर परिणाम झाला आणि त्यामुळे महामार्गाचं काम रखडलं, असा दावा त्यांनी केला. ट्रम्प यांच्या वक्तव्यांवर टीका करताना त्यांनी त्यांच्या धोरणांमुळे भारतातील नागरिकांवरही परिणाम होत असल्याचं म्हटलंय. यावेळी विखे पाटील यांनी मिश्कील टिप्पणी करत, “जे दारू पितात त्यांची दारू पिण्याची क्षमता वाढली,” असं वक्तव्य केलं. ट्रम्प कधी युद्ध संपल्याचं सांगतात तर लगेच क्षेपणास्त्र हल्ले होतात, अशी टीकाही त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीय. (Top 10 News)
६) ज्याची भीती तोच निर्णय अमेरिकेने घेतला, चीनला हवे तेच घडले, थेट 4 देश धोक्यात..
मध्य पूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील आपली शेवटची युद्धनौका परत बोलावल्याचा दावा केला जातोय. या निर्णयामुळे चीनला मोठा धोरणात्मक फायदा होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झालीय. अमेरिकेच्या या निर्णयावर चीनकडूनही टोला लगावण्यात आल्याचे सांगितले जातेय. विशेषतः जपान, तैवान, फिलिपीन्स आणि इंडोनेशियाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मध्य पूर्वेतील लष्करी कारवाईमुळे अमेरिकेच्या नौदलावर आणि सैनिकांवर वाढता ताण असल्याचेही या वृत्तात म्हटलेय. दरम्यान, चीनने अलीकडेच चीन समुद्र आणि जपानच्या आसपासच्या सागरी क्षेत्रात मोठे लष्करी सराव केले आहेत. त्यामुळे अमेरिकेची नौदल उपस्थिती कमी झाल्यास चीन या परिस्थितीचा फायदा घेऊन या देशांवर दबाव वाढवू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जातेय. (Top 10 News)
७) नोटीस आल्याने शेतकऱ्याचा संताप; म्हैस थेट बँक मॅनेजरच्या केबिनमध्ये घेऊन गेला
बँकेकडून कर्ज थकल्याची नोटीस आल्यानंतर एका शेतकऱ्याने चक्क आपली म्हैस थेट बँकेत नेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. म्हैस जप्त करण्याची नोटीस मिळाल्यानंतर शेतकरी म्हशीला घेऊन बँकेत पोहोचला. एवढंच नाही, तर तो म्हशीसह लिफ्टमधून थेट बँक मॅनेजरच्या केबिनमध्ये गेला. त्याने मॅनेजरला, “घ्या तुमची जप्तीची म्हैस, आता तुम्हीच सांभाळा, असं म्हणाला. शेतकरी म्हशीला घेऊन बँकेत आल्याने कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांनाही धक्का बसला. लिफ्टमध्ये म्हैस पाहून तेथील एका व्यक्तीचीही चांगलीच तारांबळ उडाल्याचं दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, शेतकऱ्याच्या या अनोख्या कृतीवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. (Top 10 News)
८) टोयोटा भारतात आणणार सर्वात स्वस्त Land Cruiser
फॉर्च्युनरला टक्कर देण्यासाठी टोयोटाची सर्वात स्वस्त लँड क्रुझर भारतात येण्याची शक्यता आहे. Toyota Land Cruiser FJ भारतात २०२८ पर्यंत लाँच होऊ शकते. विशेष म्हणजे, या SUVची निर्मिती भारतात करण्याची कंपनीची योजना असल्याने किंमत तुलनेने कमी ठेवण्यास मदत होऊ शकते. या कारची संभाव्य किंमत सुमारे ३० लाख रुपये असण्याची शक्यता असून, तिची थेट टक्कर Mahindra Scorpio-N 4×4 आणि Force Gurkha सारख्या SUVशी होऊ शकते. Land Cruiser FJमध्ये २.७ लिटर पेट्रोल इंजिन, ६-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि 4×4 ड्राइव्ह मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय १२.५ इंच टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सनरूफ आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलसारखी फीचर्स मिळू शकतात. मात्र, लाँचची तारीख, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेली नाहीत. (Top 10 News)
०९) दीपिका पदुकोणचा प्रेग्नेंसीदरम्यान क्लासी लुक समोर
अभिनेत्री दीपिका पदुकोण पुन्हा एकदा चर्चेत आलीय. दीपिका दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या वृत्तांदरम्यान ती बऱ्याच दिवसांनी विमानतळावर स्पॉट झाली. पती रणवीर सिंह स्वतः पत्नी आणि मुलगी दुआला विमानतळावर सोडण्यासाठी पोहोचला होता. दीपिका बंगळुरूकडे रवाना होत असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी दीपिकाचा क्लासी लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला. तिने ओव्हरसाईज्ड शर्ट आणि बॅगी जीन्स परिधान केली होती. या लूकमध्ये तिचा बेबी बंपही दिसत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. रणवीर मात्र कॅमेऱ्यांसमोर न येता गाडीतच थांबला. दीपिका आणि रणवीर यांनी २०१८ मध्ये लग्न केलं होतं. सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांनी मुलगी दुआचं स्वागत केलं. आता दुसऱ्या अपत्याच्या आगमनाची चाहत्यांना उत्सुकता आहे. (Top 10 News)
१०) माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या आयुष्यावर येणार बायोपिक
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि स्टार फलंदाज विनोद कांबळी यांचे जीवन आता चित्रपटातून नव्हे, तर वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी कांबळी यांच्या आयुष्यातील अनेक अज्ञात पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी ‘कांबळी’ या बहुप्रतिक्षित हिंदी वेब सीरिजची घोषणा केली असून, या सीरिजची निर्मिती ‘200 नॉट आऊट प्रोडक्शन्स’चे रवी भागचंदका करत आहेत. ही सीरिज लवकरच एका नामांकित डिजिटल प्लॅटफॉर्मवर दाखल होणार आहे.या वेब सिरीजमध्ये विनोद कांबळी यांची क्रिकेट कारकीर्द तसेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि संघर्ष दाखवण्यात येईल. त्यांची विलक्षण प्रतिभा, क्रिकेटमधील त्यांचे प्रचंड यश आणि संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अनुभवलेल्या अडचणी या कथेचा भाग असतील. तसेच या सीरिजमध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची मैत्री कशी होती हेही दाखवण्यात येणार आहे. नोव्हेंबर 2026 मध्ये या वेब सिरीजच्या चित्रीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. (Top 10 News)





