तळेगाव ढमढेरे : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या तळेगाव ढमढेरे–रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटातील चौरंगी भाजपाच्या उमेदवार दीपाली राहुल गव्हाणे यांनी विजय खेचून आणला. चौरंगी लढतीत गव्हाणे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य रेखा बांदल, शिवसेनेच्या सारिका कर्पे आणि अपक्ष रेश्मा शिंदे यांच्यावर मात केली. गव्हाणे यांना मिळालेली तळेगाव ढमढेरे येथील मताधिक्य घेतल्याने ही आघाडी विजयाची नांदी ठरली. प्रबळ, प्रस्थापित उमेदवार आखाड्यात असताना गव्हाणे यांचा विजय गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना उभारी देणारा ठरला आहे. दीपाली गव्हाणे यांचे डिग्रजवाडी गाव एकजुटीने मैदानात उतरले होते, तर शेवटच्या टप्प्यात एक गाव एक उमेदवार समितीच्या वतीने सुनील ढमढेरे व मार्तंड ढमढेरे यांनी दिलेला पाठिंबा सकारात्मक ठरला. तळेगाव ढमढेरे गणातून भाजपच्या विद्या भुजबळ विजयी झाल्या, तर रांजणगाव सांडस गणातून राष्ट्रवादीचे विजय रणसिंग यांनी बाजी मारली आहे. गव्हाणे यांनी प्रचारात गटातील प्रलंबित प्रश्न सोडवून रस्ते, पाणी, शिक्षणावर भर दिला होता. मतदारांशी थेट संवाद, महिलांचे प्रश्न आणि त्याच्या समस्यांचे निराकारण करण्याचे दिलेले आश्वासन, प्रचाराचे काटेकोर नियोजन आदी मुद्द्यांवर दीपाली गव्हाणे आणि राहुल गव्हाणे यांनी बाजी मारली. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेला आता आत्मचिंतनाची वेळ आली आहे. आमदारांची लेक झेडपीत दीपाली राहुल गव्हाणे या वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या कन्या असून त्यांच्या विजयासाठी आमदारांनी स्वतः या गटात गाठीभेटी आणि दौरे करीत प्रचाराचे नियोजन केले होते. त्यांचे बंधू सुरेंद्र पठारे, भावजय ऐश्वर्या पठारे यांनीही स्थानिक स्तरावर बैठका घेऊन प्रचाराला मोठी ताकद दिली होती. सामाजिक समतोलाचा फॉर्म्युला भाजपने तळेगाव ढमढेरे गणातून (स्व.) संभाजीराव भुजबळ यांच्या कुटुंबातील विद्या भुजबळ यांना उमेदवारी देऊन सामाजिक समतोल साधला होता. त्यामुळे ओबीसी मतदारांचा कल महायुतीकडे वळला, ज्याचा थेट फायदा दीपाली गव्हाणे यांना झाला. विद्या भुजबळ यांनी ९,६८५ मते मिळवून पंचायत समिती गणात विजय मिळवला आहे. रांजणगाव सांडस गणात रणसिंग यांचा निसटता विजय रांजणगाव सांडस पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय रणसिंग यांनी अवघ्या १४९ मतांच्या फरकाने निसटता विजय मिळवला आहे. रणसिंग यांना ५ हजार ७५८ मते मिळाली, तर भाजपचे हनुमंत काळे यांना ५ हजार ६०९ आणि शिवसेनेचे राहुल रणदिवे यांना ५ हजार १२५ मते मिळाली. रणसिंग यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.