Rajya Sabha Candidate List : राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून १० राज्यांतील जागांसाठी मतदान १६ मार्च रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ५ मार्च आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने ९ राज्यांतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. विशेष म्हणजे, भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांना बिहारमधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपची जाहीर उमेदवारांची यादी (Rajya Sabha Candidate List ) बिहार : नितीन नवीन, शिवेश कुमार आसाम : तेराश गोवाला, जोगेन मोहन छत्तीसगड : लक्ष्मी वर्मा हरियाणा : संजय भाटिया ओडिशा : मनमोहन सामल, सुजीत कुमार पश्चिम बंगाल : राहुल सिन्हा या पहिल्या यादीत बिहार, आसाम, छत्तीसगड, हरियाणा, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील एकूण ९ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. नितीन नवीन एक प्रभावशाली चेहरा (Rajya Sabha Candidate List ) भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना बिहारमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पाटण्याच्या बांकीपूर मतदारसंघातून पाचवेळा आमदार राहिलेले नितीन नवीन बिहारच्या राजकारणातील एक प्रभावशाली चेहरा आहेत. याशिवाय युवा नेते शिवेश कुमार यांनाही बिहारमधून उमेदवारी देण्यात आली आहे. बिहारमध्ये एकूण ५ राज्यसभा जागांसाठी निवडणूक होणार आहे. पश्चिम बंगाल, आसाम व ओडिशा (Rajya Sabha Candidate List ) पश्चिम बंगालमधून राज्यातील भाजपाचा प्रमुख चेहरा असलेल्या राहुल सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आसाममधून तेराश गोवाला आणि जोगेन मोहन या दोन नेत्यांना संधी देण्यात आली असून राज्यात तीन जागांसाठी निवडणूक होणार आहे. ओडिशामधून मनमोहन समल आणि सुजीत कुमार यांना उमेदवारी मिळाली आहे. राज्यात भाजपाची सत्ता असल्याने पक्षाची स्थिती भक्कम मानली जात आहे. छत्तीसगडमधून लक्ष्मी वर्मा यांना उमेदवारी छत्तीसगडमधून भाजपा महिला मोर्चात सक्रिय असलेल्या आणि सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मी वर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यात दोन जागा रिक्त होत आहेत. हरियाणामधून प्रशासकीय पार्श्वभूमी असलेले आणि पक्षसंघटनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे संजय भाटिया यांना उमेदवारी मिळाली आहे. हरियाणातही दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे. ३७ जागांसाठी निवडणूक राज्यसभेच्या ३७ जागांपैकी सर्वाधिक ७ जागा महाराष्ट्र मधून निवडल्या जाणार आहेत. त्यानंतर तामिळनाडू (६), बिहार व पश्चिम बंगाल (प्रत्येकी ५), ओडिशा (४), आसाम (३), तेलंगाणा (२) तर छत्तीसगड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमधून प्रत्येकी एक जागेसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातून कोणाला संधी? महाराष्ट्रातील ७ जागांसाठी विविध नावांची चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भागवत कराड यांचा कार्यकाळ संपत आहे. भाजपकडून संभाव्य उमेदवारांमध्ये विनोद तावडे, रावसाहेब दानवे, विजया रहाटकर, प्रीतम मुंडे, भारती पवार, मिलिंद कांबळे, दिलीप कांबळे, माधव भंडारी, अमर साबळे आदींची नावे चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.