Bhima River Flood: दौंडमध्ये नद्यांना पूर! १५ दिवसांत तब्बल ३ वेळा पूल पाण्याखाली; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
Bhima River Flood: धरण क्षेत्रात सततच्या पावसामुळे भीमा व मुळा-मुठा नद्यांची पाणीपातळी वाढली; वाळकीतील श्री संगमेश्वर पुलावरून पुराचे पाणी वाहिल्याने वाहतूक ठप्प.

Bhima River Flood – दौंड तालुक्यातील वाळकी येथील श्री संगमेश्वर पूल गेल्या पंधरा दिवसांत तब्बल तीन वेळा पुराच्या पाण्याखाली गेल्याने परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. धरण क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पावसामुळे भीमा व मुळा-मुठा नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. पुराचे पाणी नदीकाठच्या शेतजमिनींमध्ये शिरल्याने तीव्र प्रवाहामुळे काठावरील सुपीक जमीन मोठ्या प्रमाणात खचून वाहून गेली आहे.
त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. पुलावरून वारंवार पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होत असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतातील मातीचा सुपीक थर वाहून गेल्याने आगामी हंगामातील शेती उत्पादनावरही गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी शेतांचे बांध फुटले असून पिके पाण्याखाली गेली आहेत.
पुरामुळे झालेल्या नुकसानीची प्रशासनाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत आणि शासनाच्या निकषांनुसार बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. तसेच, भविष्यात नदीकाठची धूप रोखण्यासाठी संवेदनशील ठिकाणी संरक्षक बंधारे बांधावेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पुराच्या काळात नागरिकांनी धोका पत्करून पुलावरून प्रवास करू नये, तसेच प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक तेथे वाहतूक बंद करून पर्यायी मार्गांची सोय करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. पुराचे पाणी पूर्णपणे ओसरल्यानंतरच नुकसानीची अचूक आकडेवारी स्पष्ट होणार आहे.
जलपर्णी व कचऱ्यामुळे शेतीची नासाडी
पुण्यातून पुराच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणावर कचरा आणि सडलेली जलपर्णी वाहून आली आहे. हा कचरा नदीकाठच्या उसाच्या शेतांमध्ये साचल्याने ऊस पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. या सडलेल्या जलपर्णीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांची उत्पत्ती वाढल्याने रोगराई पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.





