नवी दिल्ली, – केंद्रीय कामगार संघटना आणि अखिल भारतीय बॅंक कर्मचारी संघटांच्या समर्थकांनी उद्या (दि. 28) आणि परवा (दि. 29) रोजी भारत बंदची हाक दिली आहे. शेतकरी, कामगार आणि सर्व सामान्य नागरिकांशी संबंधित केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी या भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
कामगार संघटनांच्या 23 मार्च रोजी झालेल्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी बॅंकांच्या कर्मचाऱ्यांनीही या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय बॅंक कायद्यातील प्रस्तावित दुरुस्ती विधेयकालाही बॅंक कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. या भारत बंदमध्ये वाहतूक, परिवहन कर्मचारी इलेक्ट्रिसिटी कामगार देखील सहभागी होणार आहेत, असे कामगार संघटनांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रातील कामगार संघटना या संपाच्या समर्थनार्थ शेकडो ठिकाणी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे.
याशिवाय कोळसा, तेल, दूरसंचार, टपाल, प्राप्तीकर, तांबे आणि विमा क्षेत्रासारख्या अन्य क्षेत्रांमधील कामगार संघटनाही या भारत बंदमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
या भारत बंदमुळे देशातील बॅंक व्यवहार विस्कळीत होण्याची शक्यता आहे, असे स्टेट बॅंक ऑफ इंडियाने म्हटले आहे. संपामुळे नागरिकांच्या व्यवहारांवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. तरीही बॅंकांचे व्यवहार अंशतः प्रभावित होण्याची शक्यता आहे, असे “एसबीआय’ने म्हटले आहे.
पश्चिम बंगालमध्ये सरकारने सर्व बॅंक कर्मचाऱ्यांना काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले असल्यामुळे या भारत बंदचा त्या राज्यात परिणाम न होण्याची शक्यता आहे.