Balochistan Conflict: पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात गेल्या काही दिवसांपासून तीव्र संघर्ष सुरू आहे. बॉम्बस्फोट, रॉकेट हल्ले आणि गोळीबारामुळे अनेक शहरं हादरली आहेत. जवळपास ४० तास सुरू असलेल्या चकमकीत सुमारे २०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. हा संघर्ष बलुचिस्तानमधील विविध जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी झालेल्या हल्ल्यांनंतर सुरू झाला. क्वेटा, ग्वादर, मुस्तुंग आणि नोशकी यांसारख्या भागांत दहशतवादी कारवाया करण्यात आल्या. या हल्ल्यांची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) या संघटनेने स्वीकारली आहे. (Balochistan Conflict) हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कर, पोलिस आणि दहशतवादविरोधी पथकांनी मोठी कारवाई सुरू केली. दोन्ही बाजूंमध्ये जोरदार चकमक झाली. अधिकृत माहितीनुसार, मृतांमध्ये ३१ नागरिक, १७ सुरक्षा कर्मचारी आणि १४५ बीएलए सदस्यांचा समावेश आहे. काही अहवालांनुसार, शनिवारीच १०० हून अधिक लोक मारले गेले. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बलुचिस्तानचे (Balochistan) मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी क्वेटा येथे पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या छापेमारी आणि शोध मोहिमांमध्येही अनेक जण ठार झाले. दहशतवादाविरोधातील लढ्यातील हा सर्वात मोठा बळी असल्याचे त्यांनी नमूद केले. Pakistan Afghanistan War दरम्यान, बीएलएने “ऑपरेशन हारोफ” चा दुसरा टप्पा सुरू केल्याचा दावा केला आहे. संघटनेच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, नोशकी येथील दहशतवादविरोधी विभागाचे मुख्यालय ताब्यात घेण्यात आले आणि फ्रंटियर कॉर्प्सच्या युनिटवर हल्ला करण्यात आला. काही ठिकाणी तुरुंगातून कैद्यांची सुटका केल्याचाही दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी प्रभावित भागात मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे. अनेक ठिकाणी कर्फ्यू सदृश परिस्थिती आहे. मुख्य रस्ते आणि बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मोबाइल इंटरनेट सेवा २४ तासांहून अधिक काळ बंद करण्यात आली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. नागरिक भीतीच्या वातावरणात घरातच थांबले आहेत. या संघर्षानंतर पाकिस्तानने भारतावर आरोप केले. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी हल्ल्यांमागे भारताचा हात असल्याचा दावा केला. मात्र भारताने हे आरोप फेटाळून लावले आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानने आपल्या अंतर्गत समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बलुचिस्तानमधील हा संघर्ष केवळ सुरक्षा प्रश्न नसून राजकीय आणि सामाजिक असंतोषाशीही जोडलेला मानला जातो. सध्या परिस्थिती तणावपूर्ण असून पुढील काही दिवसांत आणखी घडामोडी होण्याची शक्यता आहे.