नवी दिल्ली – पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील निवडणूक कार्यालयांमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या बॉम्बस्फोटांमध्ये किमान २५ जण ठार झाले. तर अन्य ४६ जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानमध्ये उद्या सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यापूर्वीच निवडणूक कार्यालयांमध्ये हे बॉम्बस्फोट झाले आहेत.
पहिला बॉम्बस्फोट पिशिन जिल्ह्यातील अपक्ष उमेदवार असफंदयार खान काकर यांच्या निवडणूक कार्यालयामध्ये झाला. या स्फोटात १७ जण ठार झाले आणि ३० जण जखमी झाले. हा स्फोट रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित केला होता आणि कार्यालयाबाहेर एका पिशवीमध्ये बॉम्ब ठेवला होता, असे पोलिसांनी सांगितले. जखमींना क्वेट्टा येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून काही जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे, असेही पोलिसांनी सांगितले.
या स्फोटानंतर तासाभरातच किला अब्दुल्लाह भागात जमियत उलेमा इस्लाम पाकिस्तानच्या निवडणूक कार्यालयाबाहेर दुसरा बॉम्बस्फोट झाला. त्यामध्ये ८ जण ठार झाले आणि १२ जण जखमी झाले.
उद्यो होणाऱ्या निवडणूकीमध्ये नागरिकांना मतदानासाठी परावृत्त करण्यासाठी दहशतवाद्यांकडून उमेदवारांना लक्ष्य केले जाते आहे. मात्र सुरक्षा यंत्रणा निवडणूक पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे बलुचिस्तानच्या पानिगर भागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या दोन्ही बॉम्बस्फोटांच्या सूत्रधारांना पकडले जाईल, असा विश्वास निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केला. निवडणुकांमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न होत असला, तरी निवडणुका नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडतील, असे बलुचिस्तानचे गृहमंत्री जन अंचकझाई यांनी म्हटले आहे.
इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या बलुचिस्तान प्रांतात गेल्या आठवड्यांपासून निवडणुकीशी संबंधित हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. मंगळवारी सुरक्षा चौक्या, प्रचार कार्यालये आणि वेगवेगळ्या भागातल्या प्रचार फेऱ्यांवर १० हातबॉम्ब फेकले गेले होते. शनिवारपासून बलुचिस्तानमध्ये अशाप्रकारचे ५० हल्ले करण्यात आले आहेत. सिबी गावातील पीटीआयच्या उमेदवाराच्या रॅलीवर झालेल्या बॉम्बहल्ल्यात ४ जण ठार झाले होते.
बलुचिस्तान मधील बंदी घातलेल्या संघटनांकडून सुरक्षा रक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले करत आहेत. गेल्या आठवड्यात सलग ३ दिवस चाललेल्या कारवाईमध्ये २४ दहशतवादी मारले गेले होते. बाग बझार येथील सरकारी शाळेमध्ये देखील स्फोट घडवण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला होता. मात्र सुरक्षा दलांनी बॉम्ब वेळीच निकामी केला होता.