Narayan Rane : ‘बाळासाहेब गेले अन् शिवसेना संपली’; नारायण राणेंच्या विधानाने नवा वाद?

अहिल्यानगर : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान केलं आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी भाजपाचे नेते तथा खासदार नारायण राणे यांना विचारला असता राणे म्हणाले की, तुम्ही चांगल्या दिवशी नको त्या माणसाचं नाव घेता. विकास, समृद्धी, लोकहित हे उद्धव ठाकरेंचं काम नाही. शिव्या घालणं आणि चांगल्या कामात व्यत्यय आणणं हे उद्धव ठाकरे यांच काम आहे.
त्यामुळे त्यांचा (उद्धव ठाकरे) पक्ष आवळत चालला आहे. पुढच्या निवडणुकीपर्यंत हा पक्ष राहत नाही. मी ३९ वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा पक्ष होता. पण बाळासाहेब ठाकरे गेले आणि शिवसेना संपली, असं विधान नारायण राणे यांनी केले आहे. खासदार नारायण राणे यांच्या यावक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नारायण राणे हे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी हे विधान केले. शिवाय त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर ही जोरदार हल्लाबोल चढवला.
काय म्हणाले नारायण राणे?
नारायण राणे म्हणाले की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाची दिशा दाखवली. विकसित भारत बनवण्याचा त्यांचा संकल्प आहे. तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात चांगलं काम सुरू आहे. विरोधकांकडे दुसरे काम राहिले नाही. देश आणि राज्यात लोक कल्याणाचा कारभार सुरू आहे, असं नारायण राणे म्हणाले.
पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले की, विरोधकांचा त्या कायद्याचा अभ्यास नाही. त्यांनी ते वाचावे. कोणाच्या जाती धर्माविरोधात हे बिल नाही. वक्फच्या नावाने जो दुरुपयोग चालला होता तो थांबवावा आणि मुस्लिम समाजात जे गरीब लोक किंवा तलाक झालेल्या महिला आहेत, त्यांचं पुनर्वसन व्हावं, त्यांना शिक्षण मिळावं, हा समाज देखील प्रगत समाजाबरोबर जावा. त्यादृष्टीने वक्फ बिल आणले आणि ते मंजूर झालंय.
चांगल्या दिवशी नको त्या माणसाच नाव?
चांगल्या दिवशी नको त्या माणसाच नाव घेत आहात. विकास, समृद्धी, लोकहित हे त्यांचे काम नाही. शिव्या घालणं आणि चांगल्या कामात व्यत्यय आणणं हेच उद्धव ठाकरे यांचे काम आहे. म्हणून पक्ष आवळत चालला आहे. पुढच्या निवडणुकीत हा पक्ष राहत नाही. विधायक, सामाजिक, विकासात्मक अशी त्यांची विचारसरणी नाही. मी ३९ वर्ष त्यांच्या सोबत काम केले आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा पक्ष होता. साहेब गेले तेव्हा शिवसेना संपली, असं विधान नारायण राणे यांनी यावेळी केलं.
संजय राऊत मुर्ख माणूस
पुढे बोलताना म्हणाले, संजय राऊत हा व्यक्ती दुकान चालवतो. सका़ळी उठला की मी असं केलं तसं केलं असं सांगत असतो. राऊत यांचं देशासाठी, राज्यासाठी कर्तृत्व सांगा? असा प्रश्न त्यांनी केला. त्यांचं विधायक काम नाही. संजय राऊतच्या कोणत्याही वक्तव्यावर मी बोलणार नाही. मुर्ख माणूस आहे, असं मी समजतो. त्याचं प्रत्येक वाक्य वाद निर्माण करणारं आहे. अशा माणसावर बोलून मला वेळ वाया घालवायचा नाही, अशी टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली.





