Devendra Fadnavis: “…तेव्हा प्रेमभंग झाला, आता प्रेम जुळणं कठीण”; देवेंद्र फडणविसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Devendra Fadnavis: "आम्ही जेव्हा विरोधात होतो तेव्हा एकही माणूस फुटला नाही, कारण..." फडणवीसांनी केले स्पष्ट

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीदरम्यान ऑपरेशन टायगरवर भाष्य करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान होण्यात एकनाथ शिंदे अडसर ठरू शकतात म्हणून निवडणूक नसताना फोडाफोडी सुरू आहे,’ असं खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. यावर मुलाखतीदरम्यान प्रतिक्रिया विचारली असता, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.
…तेव्हा प्रेमभंग झाला
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हिंदीत एक गाणं आहे बघा, ‘माना के तेरे जहां मे ये नहीं के प्यार नहीं मिलता, वो जब चाहिये तब नहीं मिलता’. हे सगळं प्रेम मला २०१९ ला हवं होतं. तेव्हा प्रेमभंग झाला आहे, आता प्रेम जुळणं कठीण आहे.” मात्र प्रेमात माफीही असते ना? असा प्रश्न विचारताच फडणवीसांनी, “प्रेमभंगानंतर आम्ही दुसरे लग्न केले. संसार थाटला. पुन्हा आमच्या लग्नाचे वाढदिवस झाले. आता काय राहिले?”, असे मिश्किल उत्तर दिले.
पुढे ते म्हणाले, “असं काय प्रेम आमच्यात उरलं आहे की जे दिवसरात्र माझ्या बरोबर आहेत त्यांना थांबवून ज्यांनी माझी योग्य वेळी साथ सोडली त्यांच्या मदतीला जावं, त्याचं काहीच कारण नाही. मित्र पक्षाने सहा खासदारांचं ऑपरेशन जे काही ते केलं, बाकी अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा राजकारणात घडतात तेव्हा त्याचे तपशील जाहीर करायचे नसतात. मित्र पक्षाला आमचा योग्य तो पाठिंबा होता, त्यांना जी आवश्यकता पडली तेवढी मदत आम्ही त्यांना केली आहे,” शिंदे गटाला मदत केल्याचा खुलासा देखील यावेळी फडणवीस यांनी केला. Devendra Fadnavis
….तेव्हा एकही माणूस फुटला नाही
ज्यावेळी विरोधी पक्षाची भूमिका बजावली त्याबद्दल देखील फडणविसांनी सांगितले. “राजकारणात प्रत्येकजण भविष्य पाहत असतो, ज्या नेतृत्वात मी काम करत आहे, ते नेतृत्व माझं भविष्य सुरक्षित ठेवू शकत नाही हे जेव्हा वाटू लागतं, तेव्हा जिथे भविष्य दिसतं तिथे लोक जातात.
अडीच वर्षे आम्ही जेव्हा विरोधात होतो तेव्हा एकही माणूस फुटला नाही. कारण अडीच वर्षे आम्ही आमच्या लोकांना घेऊन भांडत राहिलो. आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही घाबरलो नाही. आम्ही एकही दिवस सरकारला झोपू दिलं नाही, त्यामुळे सोबतच्या लोकांना हा विश्वास होता की, ज्या नेत्यासह आपण काम करतोय तो उद्या का होईना सत्तेपर्यंत नेऊ शकतो,” असे फडणविसा म्हणाले.
“आम्ही जेव्हा १५ वर्षे विरोधी पक्षात होतो तेव्हा आमचे नेते मुंडे साहेब होते. त्यांच्यामुळे आम्हाला हे वाटायचं की आपल्याजवळ हा नेता आहे. कुठल्याही पक्षात नेत्याने आत्मविश्वास वाढवला पाहिजे ते दिसत नाही तेव्हा मग पक्ष संपतात. आता राजकीय अस्तित्वाचा विषय हा त्यांच्यासाठी आहे माझ्यासाठी नाही. माझ्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्नच नाही ते कसं टिकवायचं ते मला माहित आहे,” अशी टीकाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
हेही वाचा:






