Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारतचे ६४३ कोटी रुपयांचे दावे खोटे; तब्बल ‘इतक्या’ रुग्णालयांवर मोठी कारवाई

Ayushman Bharat Yojana : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्यसभेत खाजगी रुग्णालयांच्या फसवणुकीचा पर्दाफाश केला. आयुष्मान भारत आरोग्य विमा योजनेअंतर्गत या रुग्णालयांचे ३.५६ लाख दावे नाकारण्यात आले आहेत. तसेच १,११४ रुग्णालयांचे ६४३ कोटी रुपयांचे दावे खोटे असल्याचे आढळून आले आहे अशी माहिती त्यांनी दिली.
जाधव यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले की, १५०४ अनियमित रुग्णालयांवर १२२ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच, ५४९ रुग्णालये निलंबित करण्यात आली आहेत.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत, राज्य आरोग्य संस्था नियमित डेस्क मेडिकल ऑडिट तसेच फील्ड ऑडिट करतात. यामध्ये एकूण १,११४ रुग्णालयांना पॅनेलमधून काढून टाकण्यात आले आहे.
जाधव म्हणाले की, महाराष्ट्रात गुलेन-बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) २२४ रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी ३ मार्चपर्यंत १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तपासणीत असे दिसून आले आहे की हा आजार कॅम्पिलोबॅक्टर संसर्गामुळे होतो, ज्यामुळे अतिसार होतो. बहुतेक प्रकरणे पुणे आणि नांदेडमधील आहेत.
शून्य प्रहरात पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा म्हणाले की, केंद्र सरकार २०२५-२६ या वर्षात देशभरातील रुग्णालयांमध्ये दोनशेहून अधिक कर्करोग डे केअर सेंटर उघडत आहे. जिथे रुग्णांना कर्करोग उपचारांसाठी मूलभूत सुविधा पुरविल्या जातील. ही सर्व केंद्रे पुढील तीन वर्षांत स्थापन केली जातील.
ते म्हणाले की, सरकार आरोग्य सेवा स्वस्त आणि सुलभ करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी राज्यांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य दिले जात आहे. झज्जरमध्ये स्थापन झालेल्या एम्समध्ये देशातील सर्वात मोठे कर्करोग उपचार केंद्र स्थापन केले जाईल, ज्यामध्ये ७०० खाटा असतील.





