Summer | health : गेल्या काही दिवसांपासून शहरात उन्हाचा पारा चांगलाच वाढल्याने आरोग्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. यामुळे स्वतःचा बचाव करीत असताना उष्म्याचा त्रास होऊ नये यासाठीही काळजी घ्यावी लागत आहे. वाढत्या उन्हाची तीव्रता चांगलीच जाणवू लागली आहे. उन्हामुळे सातत्याने शरीरातून बाहेर पडणाऱ्या घामामुळे अशक्तपणा वाढतो. त्याशिवाय डोकेदुखीचं प्रमाणही वाढतं. काहींची अवस्था हात-पाय गळल्यासारखी होते. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सर्वत्रच तापमानाचा पारा चढता आहे. वाढत्या उन्हाळामुळे जिवाची काहिली होऊ लागल्याने दुपारी बारानंतर बाहेर पडणं कठीण झालं आहे. दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. अशातच काहींना बाहेर फिरण्याशिवाय पर्याय नसतो. तरीही उन्हात बाहेर फिरताना गॉगल वापरणं, डोक्यावर टोपी घालणं किंवा रस्त्यांवर उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाऊ नयेत अशा सूचना डॉक्टरांकडून करण्यात येत आहेत. त्याशिवाय सातत्याने शरीरातून घाम बाहेर फेकला जात असल्याने डिहायड्रेशन होण्याचं प्रमाणही वाढू लागलं आहे. डिहायड्रेशनमुळे चक्कर येणे, अशक्तपणाबरोबर डोकेदुखी वाढल्याचं निरीक्षण डॉक्टरांकडून नोंदवलं जात आहे. अशावेळी सातत्याने पाणी पित राहणं, लिंबू सरबत, कोकम अथवा फळांचा रस प्यावा, ताक, ओआरएस घ्यावं, असा सल्लाही डॉक्टर देतात. दुपारच्या वेळी भूक लागत असल्याने अनेकांना मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होते; परंतु उन्हात फिरून आल्यानंतर दुपारी मसालेदार पदार्थ खाल्ले, तर पोटाचे विकार बळावण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच मसाल्याचे पदार्थ खाणं टाळावं. अशी घ्या काळजी…. – हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. – बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करावा. – प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. – अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा चटका बसण्याची लक्षणं आहेत. – घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. – कामाच्या ठिकाणी जवळच थंड पाणी पिण्यासाठी व्यवस्था करावी. – गर्भवती महिला कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी. – शरीरातल्या पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ओरआरएस, घरी तयार केलेली लस्सी, लिंबू पाणी, ताक याचं सेवन करावे. – रस्त्यावरील फळे लगेच खाऊ नये. फ्रीजमध्ये काही वेळ ठेवून नंतर खा.