India Beat Uzbekistan : भारतीय महिला हॉकी संघाने उझबेकिस्तानला १९-० ने तुडवले! दीपिका सेहरावतने पाडला गोलचा पाऊस
India Beat Uzbekistan : उझबेकिस्तानवरील हा १९-० चा विजय भारताचा आशियाई स्पर्धांमधील तिसरा आणि एकंदरीत चौथा सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय विजय ठरला आहे.

Asian Games 2026 India Women Hockey Team Beat Uzbekistan 19-0 Deepika Sehrawat Record : जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने आपल्या मोहिमेची अत्यंत आक्रमक आणि विक्रमी सुरुवात केली आहे. भारताने पहिल्याच साखळी सामन्यात गोलचा पाऊस पाडत उझबेकिस्तानचा १९-० असा धुव्वा उडवला. सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत भारतीय खेळाडूंच्या झंझावातापुढे उझबेकिस्तानचा संघ अक्षरशः निष्प्रभ ठरला. या दमदार विजयासह पदकाचे दावेदार म्हणून संघाने आपले इरादे स्पष्ट केले आहेत.
दीपिका सेहरावतचा महापराक्रम; एकाच सामन्यात ठोकले विक्रमी ८ गोल!
या ऐतिहासिक विजयाची खरी शिल्पकार ठरली ती स्टार फॉरवर्ड दीपिका सेहरावत. तिने एकटीने तब्बल ८ गोल डागत महिला आंतरराष्ट्रीय हॉकीत भारतासाठी एकाच सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक गोल करण्याचा नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. तिने सामन्याच्या ८व्या, २२व्या, २५व्या, ३३व्या, ३६व्या, ३८व्या, ४१व्या आणि ५४व्या मिनिटाला अप्रतिम मैदानी व पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये करत प्रतिस्पर्धी बचावफळी पूर्णपणे उद्ध्वस्त केली.
इशिकाची हॅटट्रिक; नवनीत, लालरेमसियामीसह खेळाडूंची गोलवर्षाव!
INDIA THRASH UZBEKISTAN IN THE OPENING GAME AT ASIAN GAMES 2026!
Our Women’s Hockey Team defeated Uzbekistan 🇺🇿 19-0 in first match of Pool B
Deepika scored 8 Goals for India 🔥🔥🔥 pic.twitter.com/LdTPDk5ioD
— The Khel India (@TheKhelIndia) September 20, 2026
दीपिकाव्यतिरिक्त इशिकाने ११व्या, ४२व्या आणि ५४व्या मिनिटाला गोल नोंदवत शानदार हॅटट्रिक पूर्ण केली. नवनीत कौर (२३वे, ४५वे मिनिट) आणि लठंतलुआंगी (४२वे, ५१वे मिनिट) यांनी प्रत्येकी २ गोल केले. तर लालरेमसियामी, बलजीत कौर, नेहा गोयल आणि साक्षी राणा यांनी प्रत्येकी १-१ गोल करत भारताच्या १९-० अशा अभूतपूर्व धावसंख्येवर शिक्कामोर्तब केले.
भारताचा चौथा सर्वात मोठा विजय; सुवर्णपदकाकडे रोख!
भारतीय महिला संघाने २०१६ च्या दक्षिण आशियाई स्पर्धेत नेपाळविरुद्ध सर्वाधिक २४ गोल केले होते; तर आशियाई स्पर्धेत १९८२ मध्ये हाँगकाँगविरुद्ध २२-० आणि २०१८ मध्ये कझाकस्तानविरुद्ध २१-० अशा विजयांची नोंद झाली आहे. त्यामुळे उझबेकिस्तानवरील हा १९-० चा विजय भारताचा आशियाई स्पर्धांमधील तिसरा आणि एकंदरीत चौथा सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय विजय ठरला आहे.





