Arvind Shinde: पुण्याची विधानपरिषद निवडणूक ही मॅचफिक्सिंग; अरविंद शिंदेचा काँग्रेसला घरचा आहेर, थेट राहुल गांधींना ईमेल
Arvind Shinde: पुणे विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा बळी; दिल्लीतून निरीक्षक पाठवून चौकशी करण्याची अरविंद शिंदेंची मागणी.

Arvind Shinde – विधानपरिषदेची पुण्याची निवडणूक ही मॅचफिक्सिंग होती. पुणे शहरात काँग्रेसचे खच्चीकरण करण्याचे काम सुरू असून, त्यात आपल्या प्रदेशातील नेत्यांचा सहभाग आहे, असा थेट आरोप काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि नगरसेवक अरविंद शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, असा ईमेल पक्षाचे केंद्रातील नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि केसी वेणुगोपाल यांना केल्याचे शिंदे यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीवेळी वारंवार निरोप पाठवूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाचे नेते चर्चेसाठी आले नाहीत, ते राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले. त्यांनी काँग्रेस विरोधात निवडणूक लढवल्याने काँग्रेसचे २६ नगरसेवक पराभूत झाले. असे असताना विधानपरिषदेसाठी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाला पाठिंबा देण्याविषयी राज्याकडून आलेला निरोप देऊन आमच्या स्वाक्षरी घेतल्या.आमचा विरोध होता तरीही आम्ही पक्षादेश पाळला. मात्र, त्यांच्या उमेदवाराने आम्हाला कल्पना न देता माघार घेतल्याचा आरोप शिंदे यांनी केला.
काँग्रेसला लढू द्यायचे नाही आणि स्वत: भाजपशी हातमिळवणी करायची, हे दोन्ही राष्ट्रवादीचे धोरण असून, काँग्रेसला संपविण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्यात कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असून, आमच्याच पक्षातील कोण नेते जबाबदार आणि सामील आहेत, याची निरीक्षक पाठवून चौकशी करून कारवाई करावी. पुण्याचे प्रभारी सतेज पाटील यांनाही यात बाजूला ठेवले होते. प्रदेशाध्यक्षांचा आदेश असल्याचे सांगिल्याने ऑल इंडिया काँग्रेसकडे तक्रार करत आहे.
राहुल गांधी यांनीच आम्हांला ‘डरो मत’ असे सांगितले आहे. अमरावती आणि चंद्रपूरमध्ये जो न्याय केला तोच येथेही होणे अपेक्षित आहे, असेही शिंदे म्हणाले. दरम्यान, अन्य पक्षांतून काँग्रेसमध्ये जे येतील त्यांनी पक्षाशी प्रामाणिक राहिले पाहिजे, ते तसे राहातात का, हे पाहण्यासाठी आम्ही डोळे उघडे ठेवून लक्ष ठेवू, असेही शिंदे म्हणाले.
घोडेबाजार कोणी केला?
माघार घेण्याचे कारण मतदानासाठी घोडेबाजार होणार, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले; पण आता निवडणूकच झाली नाही, मग घोडेबाजार वरिष्ठ नेत्यांमध्येच झाला असा आरोप आम्ही करायचा का, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. तक्रार करण्याचा संविधानिक अधिकार मी वापरला आहे, तक्रार देखील माझ्याच पक्षाच्या नेत्यांकडे केली आहे. मी केंद्रातील वरिष्ठ नेत्यांचे वेळही मागितल्याचे शिंदे यांनी सांगितले.






