India Alliance : “…तर काँग्रेसचे अनेक खासदार सोडून जातील”; भाजप नेत्याचा मोठा दावा, उद्धव ठाकरेंवर केली बोचरी टीका
India Alliance : मुनगंटीवार यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटू शकतात.

India Alliance : काल 8 जून रोजी दिल्लीत इंडिया आघाडीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या पक्षांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रमाणीद्वारे हजर होते.
या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा, असा सल्ला दिला. तसेच इंडिया आघाडीतील समन्वयावर भाष्य करत त्यांनी खंत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका करत मोठा दावा केला.
सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा दावा (India Alliance)
ते म्हणाले “इंडिया आघाडीत खरोखरच हिंमत असेल तर त्यांनी पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करून दाखवावा. तसे झाले तर केवळ इतर पक्षच नव्हे, तर काँग्रेसचे अनेक खासदारही आघाडी सोडून जातील आणि संपूर्ण इंडिया आघाडीच कोलमडून पडेल,” असा मोठा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला. मुनगंटीवार यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटू शकतात.

India Alliance : “…तर काँग्रेसचे अनेक खासदार सोडून जातील”; भाजप नेत्याचा मोठा दावा, उद्धव ठाकरेंवर केली बोचरी टीका
उद्धव ठाकरे काय म्हणाले? (India Alliance )
उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीला एक समन्वयक आणि पंतप्रधानपदाचा संभाव्य चेहरा निश्चित करण्याचा सल्ला दिला. तसेच भाजप ‘एक देश, एक निवडणूक’ या संकल्पनेतून आता ‘एक पक्ष, एक निवडणूक’ या दिशेने वाटचाल करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी एकजुटीने लढण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले होते.
यावर प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी मांडलेला प्रस्ताव म्हणजे मध्यरात्री सूर्य उगवावा म्हणून देवाला विनंती करण्यासारखा आहे. इंडिया आघाडीत पंतप्रधानपदासाठी अनेक दावेदार आहेत. त्यामुळे एक नाव जाहीर करणे त्यांच्यासाठी अशक्य आहे.”
“देशासाठी, जनतेसाठी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. सत्ता नसतानाही संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे पक्ष आज या उंचीवर पोहोचला आहे,” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कार्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी कौतुक केले. पंतप्रधान मोदी भारताला समृद्ध, सुरक्षित, नक्षलमुक्त आणि जगात अग्रगण्य राष्ट्र बनविण्याच्या दिशेने काम करत असल्याचे सांगत त्यांनी जनतेनेही या प्रयत्नांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले.
यावेळी मुनगंटीवार यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या योगदानाचाही उल्लेख केला. “पंडित नेहरू आणि नरेंद्र मोदी हे दोघेही त्यांच्या-त्यांच्या काळातील महत्त्वाचे नेते आहेत. त्या काळातील परिस्थितीनुसार त्यांनी देशाला दिशा दिली. त्यामुळे या दोघांची थेट तुलना करणे योग्य ठरणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांविषयी कौतुकाचे उद्गार
मंत्रिमंडळात सुधीर मुनगंटीवार यांना स्थान न दिल्याने ते नाराज असल्याची चर्चा नेहमी होत असते. अजूनही अधून मधून याबाबत चर्चा होतच असतात. अशातच आता मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी कौतुकाचे उद्गार काढले. ते म्हणाले, मला निधीला कधी अडचण आली नाही. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांचे कौतुक करतो, कि ते माझा खूप मान सन्मान करतात. मी त्यांना नेहमी घरी भेटतो. माझ्या प्रत्येक विकास कार्यबदल ते खूप सकारात्मक असतात व लगेच त्याला मंजुरी देतात.
हेही वाचा : Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीकडून रितेश देशमुखला कौतुकाची थाप; नजरही काढली





