‘अरविंद केजरीवालांना मुख्यमंत्रीपदाचा मोह’; भाजपच्या ‘या’ खासदाराचा थेट आरोप, काय म्हणाले? पाहा…

Arvind Kejriwal | Bansuri Swaraj : अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाहीत. ते तपास यंत्रणेची दिशाभूल करत आहेत. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीवर आरोप असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशा शब्दांत खासदार बासुरी स्वराज यांनी केजरीवाल यांच्यावर प्रखर टीका केली.
नवी दिल्लीच्या खासदार बन्सुरी स्वराज पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय आला आहे. हा निर्णय केजरीवाल यांचा विजय नाही.
ईडीकडे पुरावे असल्यामुळे केजरीवाल हे या प्रकरणातील आरोपी असून ईडीकडे त्याचे पुरावे असल्याची पुष्टी न्यायालयाने केली आहे. आम आदमी पार्टी आपल्या सवयीमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर जनतेची आणि माध्यमांची दिशाभूल करत आहे. त्यांच्या याचिकेवर न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाही.
तसेच अरविंद केजरीवाल यांनी आपली अटक बेकायदेशीर घोषित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाही. त्यांना अटक करण्यासाठी ईडीकडे पुरेसे पुरावे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले.
हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात आले आहे. त्यामुळे केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. घटनात्मक पदावर असलेल्या एखाद्या व्यक्तीवर अशा प्रकरणात आरोप झाल्यावर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीत दिले आहेत.
याउलट केजरीवाल मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाहीत. तपास यंत्रणेची दिशाभूल करताना ते या प्रकरणात कधी सौरभ भारद्वाज यांचे नाव घेतात, तर कधी आतिशीचं तर कधी दुर्गेश पाठक यांचं नाव घेतात.





