नगर, (प्रतिनिधी) – प्रवरा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे. या वाळू उपशामुळे परिसरातील शेती उद्ध्वस्त होत आहे. तर पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. राहाता व राहुरी तहसीलदार तसेच शिर्डी प्रांताधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देवून याकडे दुर्लक्षकरत कोणतीच कारवाई केली जात नाही. महसूल मंत्री यांच्याकडून प्रवरा नदी उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप मुळा-प्रवरा खोरे पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आला.
प्रवरा नदीपात्रातील बेसुमार वाळू उपसा थांबविण्यसाठी शुक्रवारी (दि.२४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. यावेळी अरूण कडू, भास्कर फणसे, भासकर दिघे, आदिनाथ दिघे, अरूण दिघे, सागर कडू, सुर्यभान डुक्रे, गणेश कडू,
बापूसाहेब दिघे, नरेंद्र कडू, दिलीप कडू आदींसह आंदोलन कर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनास माजी आमदार सुधीर तांबे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक योगीराज गाडे, भानुदास मुरकुटे, मा. आ. लहुजी कानडे आदींनी आंदोलनास पाठिंबा दिला.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महसूल व वने विभाग यांचा दि. १९ एप्रिल २०२३ रोजीच्या शासन निर्णयात नदीचे खोलीकरणाचा मुद्दा मांडण्यात आलेला आहे. नदीच्या खोलीकरणामुळे विहिरींचे पुनर्भरण होण्याऐवजी विहिरीतील पाणी नदीच्या दिशेने खेचले जात आहे. पर्यायाने विहिरी कोरड्या होत आहेत.
खोलीकरणाच्या नावाखाली नदी पात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. शासनाचा हा निर्णय पर्यावरणाचा ऱ्हास करणारा आहे. नदीकाठचा परिसरातील शेती उद्ध्वस्त करणारा आहे.
प्रवरा नदीपात्रामध्ये आश्वी (ता. संगमनेर) ते उक्कलगाव (ता. श्रीरामपूर) दरम्यान मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. प्रवरा नदीपात्रातील ५०-६० गावातील शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. वाळू उपसा त्वरित थांबविण्याची मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.