Amit Shah : “आज बाळासाहेब ठाकरे असते तर पंतप्रधान मोदींची…”; अमित शाह यांचं मोठं वक्तव्य, वाचा सविस्तर….

Amit Shah | Uddhav Thackeray | Balasaheb Thackeray : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 25 मेपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यात आज दि. 26 मे रोजी नांदेड शहरातील नवा मोंढा मैदानावरील सभेत त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा शंखनाद केला आहे.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने दाखविलेल्या शौर्याला या सभेच्या निमित्ताने सलाम करण्यात आला. निवडणुकीनंतर अमित शाह यांचा हा पहिलाच नांदेड दौरा आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांनी भाजपात प्रवेश केला.
यावेळी अमित शहा म्हणाले की, आजचा भारत गोळ्यांना गोळ्यांनी उत्तर देतो. पाकिस्तान विसरला आहे की 10-15 वर्षांपूर्वी येथे काँग्रेसचे सरकार होते जे आता बदलले आहे. हे नरेंद्र मोदींचे सरकार आहे. जेव्हा त्यांनी उरीवर हल्ला केला तेव्हा आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला. जेव्हा त्यांनी पुलवामावर हल्ला केला तेव्हा आम्ही हवाई हल्ला केला.
जेव्हा त्यांनी पहलगामवर हल्ला केला तेव्हा आम्ही ऑपरेशन सिंदूर राबवले आणि त्यांचे मुख्य लपण्याचे ठिकाण उद्ध्वस्त केले. आमच्या हवाई हल्ल्यात शेकडो दहशतवादी नष्ट झाले. ऑपरेशन सिंदूरने संपूर्ण जगाला संदेश दिला आहे की भारतीय सैन्य भारतीय सीमा आणि भारतातील लोकांशी ढवळाढवळ करत नाही. अन्यथा, तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले की गोळ्यांना गोळ्यांनी उत्तर दिले जाईल’.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर मोदींनी निर्णय घेतला, सर्व पक्षाचे खासदार वेगवेगळ्या देशात जाऊन पाकिस्तानचा खरा चेहरा उघड करतील, शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुखांनी म्हटलं कोणाची वरात निघाली आहे,
आज बाळासाहेब ठाकरे असते तर ऑपरेशन सिंदूर नंतर नरेंद्र मोदी यांची गळा भेट घेत घेतली असती. नरेंद्र मोदी यांनी ठरवलं आहे, 2047 पर्यंत भारत विकसीत होईल, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत, या पाच वर्षांत मराठवाड्यातील प्रत्येक गावात पाणी पोहोचेल, असं शाह यांनी यावेळी म्हटलं आहे.
अमित शाह यांच्या सभेला ‘शंखनाद’ नाव देण्यात आलं….
खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तीन महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे भाजपकडून या निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह हे 25 मे रोजी नागपूरला, तर 26 मे रोजी ते नांदेडला असणार आहे. अमित शाह यांच्या या सभेला ‘शंखनाद’ असे नाव देण्यात आले आहे.
26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र करण्याच्या पायाभरणीचा हा शंखनाद असणार आहे. नक्षलवाद निर्मूलनासाठी शाह यांनी उचललेल्या पावलांचा हा शंखनाद आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचा हा शंखनाद आहे. असं खासदार चव्हाण यांनी सांगितलं आहे.





