‘निपाह’ आजारामुळे महाराष्ट्राला अलर्ट; राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्याबाबत सूचना

Nipah virus : केरळमध्ये निपाह विषाणूचा (Nipah virus) संसर्ग झाल्याने दोन मृत्यू झाले आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग (Department of Health) सतर्क झाले आहे. त्यानंतर आता राज्याच्या साथरोग विभागानेही सर्व जिल्ह्यांच्या आरोग्य विभागाला निपाहबाबत सर्वेक्षण आणि खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या आजाराचा आपल्या राज्याला फारसा धोका नसला तरी या पार्श्वभूमीवर आपण महाराष्ट्रातही खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आता केरळमधील ‘निपाह’मुळे महाराष्ट्र अलर्ट झाला आहे.
निपासदृश्य आजाराचे (मेंदूज्वर/ एईएस) सर्वेक्षण सर्व स्तरावर करा आणि तसेच प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपायोजना आखाव्यात, असे राज्याच्या हिवताप आणि जलजन्य रोग विभागाचे सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी दिलेल्या सूचनांमध्ये नमूद केले आहे.
“अक्यूट इन्सेफेलायटिस सिंड्रोम’ म्हणजेच “ए ई एस’ रुग्णांचे सर्वेक्षण करा. रुग्णाला ताप, डोकेदुखी, झोपाळूपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे असल्यास त्याला संशयित म्हणावे. रुग्ण जपानी मेंदूज्वर अथवा इतर मेंदूज्वर निगेटिव्ह असला आणि त्याने मागील तीन आठवड्यात निपाह बाधित भागामध्ये विशेषतः केरळ, ईशान्य भारतात अथवा बांगला देश सीमेलगतच्या भागात प्रवासाचा इतिहास असल्यास त्यालाही संशयित रुग्ण संबोधावे, अशा रुग्णाला विलगीकरण कक्षात भरती करावे त्याचा नमुना पुण्यातील “एनआयव्ही’ येथे पाठवावा. यावर कोणतेही औषध आजपर्यंत उपलब्ध नाही.
निपाह विषाणूचा प्रसार
या विषाणूचा प्रसार हा मुख्यत्वे फळांवर जगणाऱ्या वटवाघळांमार्फत होतो. वटवाघळांनी अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने अथवा खाल्ल्याने हा आजार होतो. डुक्कर आणि इतर पाळीव प्राणी यांना देखील याची बाधा होऊ शकते. निपाह विषाणूची लागण माणसापासून माणसालाच होऊ शकते. रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी, रुग्णसेवा करणारे नातेवाईक यांना लागण होऊ शकते. वटवाघळाच्या स्त्रावामुळे दूषित झालेला खजुराच्या झाडाचा रस पिल्याने देखील या विषाणूचा प्रसार होतो. शेतात, जंगलात अथवा इतरत्र पडलेली फळे खाणे टाळावे.
लक्षणे कोणती आहेत?
या रुग्णाला ताप, डोकेदुखी, धाप लागणे, स्नायू दुखणे, उलट्या होणे, घसा खवखवणे अशी लक्षणे (symptoms) दिसू लागतात. याशिवाय रुग्णाला चक्कर येणे, मूड बदलणे आणि न्यूरोलॉजिकल समस्यांना सामोरे जावे लागू शकते. याशिवाय रुग्णाला उलट्या आणि जुलाबाची समस्या होते. रुग्णाला अशक्तपणा जाणवतो आणि त्याच्या स्नायूंमध्ये वेदना होऊ लागतात. निपाह व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर त्याची लक्षणे 5 ते 15 दिवसांपर्यंत व्यक्तीमध्ये दिसू लागतात. या आजाराचे मृत्युचे प्रमाण 40 ते 70 टक्के एवढे आहे.





