Alephata News: अनिश्चित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त! महावितरणविरोधात ग्रामस्थ आक्रमक; उपोषणाचा इशारा
Alephata News: आठ तास नियमित वीजपुरवठा आणि अवाजवी वीजबिले कमी न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा.

Alephata News – आणे उपकेंद्रांतर्गत येणार्या व्हरुंडी (मोडओहोळ) परिसरातील विद्युत पंपधारक शेतकरी अनियमित वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. गेल्या दहा वर्षांपासून परिसरात प्रत्यक्षात केवळ तीन ते चार तासच वीजपुरवठा मिळत असून, वारंवार वीज खंडित होण्याबरोबरच कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने विद्युत पंप जळून शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार शेतकर्यांनी केली आहे.
याबाबत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. व्हरुंडी परिसरात सुमारे 45 रोहित्रे असून, प्रत्येक रोहित्रावर चार ते पाच विद्युत पंपधारक आहेत. आणे उपकेंद्रावरून पेमदरा आणि व्हरुंडी परिसरातील कृषी पंपांना एकाचवेळी वीजपुरवठा केला जात असल्याने वारंवार वीज खंडित होत असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
अनियमित आणि खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकर्यांना पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने सोयाबीन, टोमॅटो, वांगी, बाजरी, मूग, पालेभाज्या यांसह विविध पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकर्यांनी निवेदनात नमूद केले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून अनियमित वीजपुरवठा होत असतानाही शेतकर्यांना येणारी वीजबिले अवाजवी असल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांतील अवाजवी वीजबिले कमी करण्यात यावीत, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. शेतीसाठी यापुढे किमान आठ तास नियमित आणि पुरेशा दाबाने वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषण
महावितरणकडून ठोस कार्यवाही न झाल्यास संबंधित कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा समस्त व्हरुंडी (मोडओहोळ) परिसरातील विद्युत पंपधारक शेतकर्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या मागण्यांवर महावितरण प्रशासन काय निर्णय घेते, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.





