Ranjangaon Ganpati : वाघाळे परिसरात दिवसा वीज द्या; माजी सरपंच तुकाराम भोसले यांचे महावितरणकडे निवेदन
Ranjangaon Ganpati : परिसरात बिबट्या, साप आणि विंचू यांचा वावर असल्याने रात्रीच्या वेळी शेतात काम करणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या जीविताची सुरक्षितता लक्षात घेऊन रात्रीऐवजी दिवसा शेतीसाठी वीजपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

रांजणगाव गणपती : वाघाळे परिसरात कांदा लागवडीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून, शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होत नसल्याने शेतकर्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत शेतीसाठी सुरळीत थ्री फेज वीजपुरवठा सुरू ठेवावा, तसेच सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत सिंगल फेज वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वाघाळेचे माजी सरपंच तुकाराम वसंत भोसले यांनी महावितरणकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वाघाळे परिसरात सध्या कांदा लागवडीची कामे जोमाने सुरू आहेत. शेतीची मशागत, लागवड तसेच इतर कामे दिवसा करणे आवश्यक असताना त्या वेळेत वीजपुरवठा उपलब्ध होत नसल्याने शेतकर्यांची मोठी गैरसोय होत आहे. वेळेत शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी दिवसा वीजपुरवठा मिळणे अत्यावश्यक असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी शेतात काम करण्यासाठी जावे लागत असल्याने शेतकर्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात बिबट्या, साप आणि विंचू यांचा वावर असल्याने रात्रीच्या वेळी शेतात काम करणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या जीविताची सुरक्षितता लक्षात घेऊन रात्रीऐवजी दिवसा शेतीसाठी वीजपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
14 सप्टेंबरनंतर उपोषणाचा इशारा
तुकाराम भोसले यांनी 8 सप्टेंबर रोजी महावितरणच्या शिक्रापूर व रांजणगाव गणपती विभागातील अधिकार्यांना निवेदन दिले. त्यामध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत शेतीसाठी थ्री फेज वीजपुरवठा, तर सायंकाळी 7 ते रात्री 10 या कालावधीत सिंगल फेज वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. 14 सप्टेंबर 2026 पर्यंत वीजपुरवठ्याचे वेळापत्रक सुरळीत न केल्यास उपोषणाला बसावे लागेल, असा इशाराही भोसले यांनी निवेदनातून दिला आहे. शेतकर्यांची शेतीची कामे आणि त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून महावितरणने तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.





