Alandi Traffic: पालखी मार्गावर प्रवाशांचे हाल! अलंकापुरम रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याची; प्रशासनाचे दुर्लक्ष
Alandi Traffic: वडमुखवाडी चौकातून सुरू होणाऱ्या अलंकापुरम रस्त्यावर दररोज प्रचंड वाहतूक कोंडी; पावसाळ्यात साचणारे पाणी अन् खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका.

Alandi Traffic – आळंदीतील अलंकापुरम रस्त्यावर दररोज निर्माण होणारी वाहतूक कोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, नोकरदार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पुणे-आळंदी मार्ग हा ‘पालखी मार्ग’ म्हणून ओळखला जातो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तसेच कार्तिकी यात्रेच्या वेळी पांडुरंगाची पालखी याच मार्गाने प्रवास करते. या मार्गावरील वडमुखवाडी चौकातून डावीकडे वळल्यानंतर सुरू होणारा अलंकापुरम रस्ता हा पुणे-आळंदी आणि पुणे-नाशिक या दोन महत्त्वाच्या मार्गांना जोडणारा दुवा असल्याने या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते.
भोसरी, पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्र तसेच धानोरे, मरकळ, रांजणगाव आदी औद्योगिक भागांना जोडणारा हा जवळचा मार्ग असल्याने अवजड मालवाहतूक वाहनांची वर्दळ कायम असते. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रस्त्याच्या एका बाजूला डोंगररांग तर दुसर्या बाजूला सखल भाग असल्याने पावसाळ्यात डोंगर उतारावरील पाणी थेट रस्त्यावर येते.
सतत पाणी साचणे आणि अवजड वाहनांची वाहतूक यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याच रस्त्यावर अनेक शैक्षणिक संस्था असल्याने शाळा आणि महाविद्यालयांच्या वेळेत वाहतुकीचा ताण आणखी वाढतो. शाळेच्या बस, पालकांची वाहने आणि औद्योगिक वाहतूक एकाच वेळी सुरू असल्याने अनेकदा वाहतूक संथ होते.
परिणामी विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांना वेळेत गंतव्यस्थानी पोहोचणे कठीण होत आहे. नागरिकांच्या मते, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण, सिमेंट काँक्रीटचा दर्जेदार रस्ता, प्रभावी पाणी निचरा व्यवस्था आणि वाहतूक नियोजनाची तातडीने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.





