Traffic Updates: पिंपरी-चिंचवडकरांनो लक्ष द्या! ८ आणि ९ ऑगस्टला ‘हे’ रस्ते राहणार पूर्णपणे बंद; वाहतुकीत मोठे बदल
Traffic Updates: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी परतीच्या प्रवासासाठी आळंदी व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत मोठे बदल.

Traffic Updates – संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालकी ८ ऑगस्ट रोजी पंढरपूर येथून आळंदी येथे येणार आहे. ९ ऑगस्ट रोजी आळंदी नगरप्रदक्षिणा, हजेरी मारुती मंदिर येथे नारळ प्रसाद असा कार्यक्रम होणार आहे. तर संत तुकाराम महाराज यांची पालकी ८ ऑगस्ट रोजी पिंपरी येथे मुक्कामासाठी येणार असून ९ ऑगस्ट रोजी देहूगाव येथे मार्गस्थ होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालकी परतीच्या मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे.
याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी दिले आहेत. पुणे, मोशी, मरकळ चौक, चाकण चौक येथून आळंदी शहरात जाणारी वाहतूक ८ ऑगस्ट रोजी रोजी बंद असेल. ९ ऑगस्ट रोजी नगर प्रदक्षिणा मार्गावरील चाकण चौक, वडगाव चौक, केळगाव चौक येथून वाहतूक बंद असेल. या मार्गावरील वाहतुकीला पर्यायी मार्गाने वळवण्यात आले आहे. चाकण कडून येणारी अवजड वाहने आळंदी फाटा येथून वळविण्यात आली आहेत.
तसेच चिंबळी फाटा आणि जय गणेश साम्राज्य चौकातून अवजड वाहतूक वळविण्यात आली आहे. ८ ऑगस्ट रोजी पुणे-मुंबई महामार्गावरील वाहने ग्रेड सेपरेटर मधून सोडली जाणार आहेत. वल्लभनगर, डेअरी फार्म ग्रेड सेपरेटर मधून बाहेर पडता येईल. शगुन चौकाकडून येणाऱ्या वाहनांसाठी मोरवाडी चौकातून आणि साई चौकातील भुयारी मार्ग सुरु असेल. गेलार्ड चौकाकडून येणारी वाहने जमतानी चौकातून वळवली जातील.
९ ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवड लिंक रोड बंद असेल. दर्शन हॉल चौक, केशवनगर शाळा चौक, गांधी पेठ चौक चिंचवड आणि जुना जकात नाका, मोरयानगर चौक, अहिंसा चौक दळवीनगर चाक, खंडोबामाळ चौक, ग्रीव्हज कंपनी पंक्चर, गरवारे कंपनी पंक्चर, तुळजाभवानी पंक्चर, टिळक चौक निगडी, भक्ती शक्ती सर्कल हे चौक पालखी वेळेनुसार बंद ठेवले जाणार आहेत.
सेंट्रल चौक देहूरोड येथून भक्ती शक्ती चौकाकडे येणारा मार्ग ९ ऑगस्ट रोजी पूर्ण दिवस बंद असेल. देहूगावातील खंडेलवाल चौक ते परंडवाल चौक दरम्यानचा रस्ता, खंडेलवाल चौकातून देहू येथील मुख्य कमानीकडे जाणारा मार्ग, साईराज चौकातून परंडवाल चौकात येणारा मार्ग, देहुकमान येथून देहूगावात जाणारा रस्ता देखील बंद असणार आहे. पालकी मार्गस्थ झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरळीत केली जाणार आहे.






