Alandi News – श्री क्षेत्र देहू-आळंदी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत आळंदी येथील इंद्रायणी नदीवरील श्रीमंत सरसेनापती खंडेराव दाभाडे पुलाची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. त्या हा पूल पुन्हा सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे दिघी–आळंदी वाहतूक विभागाच्या हद्दीतील नागरिक आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. चऱ्होली बुद्रुक व चऱ्होली खुर्द रस्त्यांना जोडणारा सुमारे १२ मीटर रुंदीचा हा पूल दुरुस्तीच्या कामासाठी डिसेंबर २०२५ पासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा वाहतुकीसाठी सुरू करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार वाहतूक शाखेने यापूर्वीची बंदीची अधिसूचना रद्द करून पूल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला केला आहे. पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यामुळे आता या मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार असून परिसरातील नागरिक, भाविक आणि वाहनचालकांना याचा मोठा फायदा होणार आहे. संबंधित पुलाचा वापर करून वाहनचालकांनी इच्छित स्थळी मार्गस्थ व्हावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.