अजित पवारांकडून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी; शेतकऱ्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करताच म्हणाले…

Ajit Pawar | मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना पावसाने चांगलचं झोडपलं आहे. या भागात मोठा पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळित झालं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने नद्यांना पूर आला असून पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. पावसामुळे बळीराजावर अस्मानी संकट कोसळली आहे. उभी पिकं पाण्यात डोळ्यादेखत वाहून गेल्याने बळीराज्याच्या डोळ्यांत पाणी आलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तातडीने मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. त्यानंतर बुधवारी सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरचा दौरा सुरु केला असून नुकतीच त्यांनी कोर्टी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. तसेच अजित पवार हे परंडा तालुक्यातील देवगाव, भूम तालुक्यातील वालवड आणि वाशी तालुक्यातील पारगाव येथे पूर परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. धाराशिव, बीड जिल्ह्यात देखील ते पाहणी करणार आहे.
यादरम्यान शेतकऱ्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणी केली. अजित पवार यांनी थेट बोलणे टाळले. आपल्या नेहमीच्या शैलीत शेतकऱ्याला थांबवत ते म्हणाले की, मी पण शेतकरी आहे, तू पण शेतकरी आहेस. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे काही करता येईल ते करू. आता आम्हाला पाहणी तर करु दे, असे अजित पवार यांनी सांगितले.
65 मिलिमीटर पाऊस झाला नाही
यावेळी कोर्टीतील शेतकऱ्यांनी आमच्या भागात 65 मिलिमीटर पाऊस झाला, असे म्हटले. यावर अजित पवारांनी खोडून काढला. त्यांनी शेतकऱ्याला म्हटले की, हे डोक्यातून काढून टाक. याठिकाणी 65 मिलिमीटर पाऊस झाला नाही. सीना नदीत वरच्या भागातून पाणी आले आणि नदीच्या दुतर्फा हे पाणी शिरले. त्यामुळे शेतीची जमीन खरडून गेली. एका दिवसात 65 मिलिमीटर पाऊस झाला नाही, तर रोज थोडा थोडा पाऊस झाला. मी डोळ्यांनी सगळी परिस्थिती पाहिली आहे, असेही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात गेली दोन महिन्यांपासून सातत्याने अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यातील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. नदीकाठची शेती वाहून गेली आहे. घरादारात पाणी शिरले आहे, त्यामुळे शेतातील उभ्या पिकांसह घरातील धनधान्यही भिजले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांपुढे जगायचे कसे, असा प्रश्न आहे. सीना नदीला आलेल्या महापुराचे पाणी सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 124 गावांत शिरले आहे. अनेक गावे सीना नदीच्या महापुराने वेढली आहेत. Ajit Pawar |
हेही वाचा:
Pune : निवडणुकीसाठी महापालिकेची लगबग; प्रशासनाकडून २३ कक्षांची स्थापन





