हवाईदलाने केली ७०० प्रवाशांची सुटका

जम्मू – भारतीय हवाई दलाने शनिवारी जम्मू – काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांदरम्यान अडकलेल्या ७०० हून अधिक प्रवाशांची सुटका केली आणि त्यांना विमानातून सुरक्षित स्थळी हलवले. हवाई दलाच्या दोन विमानांतून त्यांना जम्मूहून लेहला नेण्यात आले, तर २२३ जणांना श्रीनगरहून लेहला दुसऱ्या विमानाने नेण्यात आले.
यासह, या आठवड्यात जम्मू आणि काश्मीर आणि लडाख दरम्यान एकूण १२५१ लोकांना विमानाने सुरक्षित स्थळी नेण्यात आले. प्रचंड हिमवृष्टीमुळे ४३४ किमी लांबीचा श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्यानंतर २२ जानेवारी रोजी भारतीय वायुसेनेने कारगिल कुरिअर सुरू केले होते.
अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी कारगिल कुरिअर सेवा जम्मू आणि श्रीनगर दरम्यान आठवड्यातून तीन दिवस आणि श्रीनगर आणि कारगिल दरम्यान आठवड्यातून दोनदा चालते. प्रवाशांनी या सेवेबद्दल भारतीय हवाईदलाचे आभार मानले आहेत.





