Ahmedabad Plane Crash: मृतांचे DNA जुळवणीत येतेय ‘ही’ मोठी अडचण, अधिकाऱ्यांनी सांगितलं किती दिवस लागणार

अहमदाबाद : अहमदाबाद येथील एअर इंडिया विमान दुर्घटनेत 242 प्रवाशांपैकी 241 जणांचा मृत्यू झाला. सिव्हिल रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी DNA नमुन्यांच्या आधारे सहा मृतांची ओळख पटवली असून, त्यांचे मृतदेह नातेवाइकांना सुपूर्द करण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी, नातेवाइकांनी ओळखलेल्या आठ मृतदेहांना DNA चाचणीशिवाय सुपूर्द करण्यात आले. रुग्णालयात आतापर्यंत दुर्घटनास्थळावरून सुमारे 270 मृतदेह आणले गेले आहेत.
फॉरेंसिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) चे संचालक एच. पी. संघवी म्हणाले, “दुर्घटनेतील प्रचंड ज्वाळांमुळे मृतदेहांची ओळख पटवणे अशक्य आहे. अशा उच्च तापमानामुळे DNA लाही नुकसान होते. पोस्टमॉर्टमदरम्यान योग्य अवयवातून DNA गोळा करणे आव्हानात्मक आहे. ही जटिल प्रक्रिया असून, एका चाचणीस 36-48 तास लागतात.” DNA चाचण्या बॅचमध्ये केल्या जात असून, अनेक चाचण्या एकाच वेळी सुरू आहेत. प्रोफाइल जुळवणी सुरू झाली असून, निकाल येऊ लागले आहेत. गुजरातच्या 36 फॉरेंसिक तज्ज्ञांची टीम राष्ट्रीय फॉरेंसिक लॅबसह हे काम करत आहे.
DNA जुळवणी प्रक्रियेला गती देण्यासाठी गुजरातचे गृहराज्य मंत्री हर्ष संघवी यांनी शनिवारी FSL अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. सिव्हिल रुग्णालयाचे अतिरिक्त अधीक्षक डॉ. रजनीश पटेल म्हणाले, “सहा DNA नमुन्यांचे निकाल आले असून, संबंधित नातेवाइकांना मृतदेह घेण्यासाठी सूचित करण्यात आले आहे. इतर मृतांची ओळख पटवण्यासाठी DNA प्रोफाइलिंग सुरू आहे, कारण त्यांचे मृतदेह जळून ओळखू येण्याच्या पलीकडे गेले आहेत.”
पोलिस निरीक्षक चिराग गोसाई म्हणाले, “शुक्रवारपर्यंत 220 मृतांच्या नातेवाइकांनी DNA नमुने दिले. पोस्टमॉर्टम कक्षात येणाऱ्या नातेवाइकांची माहिती गोळा करून त्यांना बी. जे. मेडिकल कॉलेजला DNA नमुने देण्यासाठी पाठवले जाते. DNA जुळवणी प्रक्रियेला सुमारे 72 तास लागतील. जुळवणी पूर्ण झाल्यावर मृतदेह नातेवाइकांना सुपूर्द केले जातील.”





