Ahmedabad plane crash : अहमदाबाद दुर्घटनतील मृतदेहांची अदलाबदल? ब्रिटीश मीडियाचा गंभीर दावा, भारताने स्पष्टच सांगितलं…

Ahmedabad plane crash – अहमदाबाद विमान अपघातानंतर ब्रिटनमधील कुटुंबांना दुसऱ्यांचेच मृतदेह पाठवण्यात आल्याचा दावा ब्रिटीश मीडियाकडून करण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त समोर आल्यानंतर भारताने हा आरोप फेटाळून लावला आहे. भारताने म्हटले की, या घटनेबाबत ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
दरम्यान, अहमदाबाद विमान अपघातातील एकूण मृतांपैकी ५३ ब्रिटिश नागरिक होते. यातील दोन मृतांचे चुकीचे मृतदेह ब्रिटनमधील कुटुंबांना पोहोचल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, ब्रिटनमधील दोन कुटुंबांनी त्यांना पाठवण्यात आलेले मृतदेहाचे अवशेष हे चुकीचे आहेत. अहमदाबाद येथील एका शासकीय रुग्णालयाने सीलबंद शवपेट्यांमध्ये विदेशी नागरिकांच्या मृतदेहाचे आवशेष पाठवले होते.
मात्र ब्रिटीश कुटुंबांनी त्यांना मिळालेले मृतदेहाचे अवशेष हे त्यांच्या नातेवाईकांचे नसल्याचे म्हटले आहे. ब्रिटीश नातेवाईकांच्या वतीने त्यांच्या वकीलाने या संबंधीचा दावा केला आहे. लंडनमधील कोरोनरने त्यांना पाठवण्यात आलेले मृतदेहांच्या अवशेष यांची डीएनए चाचणी केली त्यात चुकीचे अवशेष मिळाल्याचा दावा वकिलांनी केला आहे.
यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी खुलासा केला की, भारतीय अधिकारी या मुद्द्यावर त्यांच्या ब्रिटनच्या समकक्षांसोबत काम करत आहेत. आम्ही हा अहवाल पाहिला आहे आणि याबाबतच्या मुद्यावर आम्ही ब्रिटनशी संपर्क साधत आहोत.
या दुःखद अपघाताच्या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी प्रस्थापित प्रोटोकॉल आणि तांत्रिक आवश्यकतांनुसार मृतांची ओळख पटवली होती. सर्व मृतांच्या प्रतिष्ठेचा आदर करून हाताळण्यात आले. या समस्येशी संबंधित कोणत्याही चिंता दूर करण्यासाठी आम्ही यूके अधिकाऱ्यांसोबत काम करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.





