Agriculture News – सध्या शेतीसमोर एक गंभीर पण दुर्लक्षित प्रश्न उभा ठाकला आहे. पिकांचे उत्पादन वाढवण्याच्या नादात रासायनिक खतांचा बेसुमार वापर होत असल्याने जमिनीचा नैसर्गिक पोत आणि सुपीकता झपाट्याने कमी होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. जमिनीचा कस कमी होत चालल्याने भविष्यात शेती शाश्वत राहील का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात असून, कृषी तज्ज्ञांनी यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गहू, कांदा आणि इतर नगदी पिकांमध्ये अधिक उत्पादनासाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. मात्र, यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होत असून जमीन निब्बर आणि कडक बनत आहे. जमिनीचा नैसर्गिक भुसभुशीतपणा हरवल्याने पिकांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. पूर्वी ज्या जमिनीतून शाश्वत उत्पन्न मिळत होते, तिथे आता रासायनिक खतांच्या अधिक मात्रेशिवाय पीक येणे कठीण झाले आहे. सुपीकतेवर होतोय थेट परिणाम जमिनीचा पोत हा पिकांच्या जोमदार वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जमिनीचा पोत बिघडल्यास तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते आणि पिकांच्या मुळांची वाढ खुंटते. याशिवाय जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीव जसे की, रायझोबियम आणि अझोटोबॅक्टर यांचा ऱ्हास होत असल्याने जमिनीचा जिवंतपणा कमी होत आहे. सूक्ष्मजीवांची संख्या घटल्याने नैसर्गिक खत निर्मितीची प्रक्रियाही मंदावली आहे. माती परीक्षण माती परीक्षणाकडे दुर्लक्ष आळेफाटा परिसरात खतांचा वापर वर्षागणिक वाढत चालला आहे, मात्र अनेक शेतकरी माती परीक्षण न करताच अंदाजाने खतांचा वापर करत आहेत. परिणामी, जमिनीचा सामू बिघडत असून काही ठिकाणी जमीन आम्लधर्मी तर काही ठिकाणी क्षारधर्मी होत आहे. यामुळे पिकांना आवश्यक पोषकद्रव्यांचे शोषण करणे कठीण जाते आणि घातलेली महागडी खते वाया जातात, ज्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विनाकारण वाढत आहे. पर्यावरणावर उमटलेले पडसाद रासायनिक खतांच्या अतिवापराचा परिणाम केवळ जमिनीवरच नाही तर पर्यावरणावरही होत आहे. पावसाच्या पाण्यासोबत ही खते वाहून जाऊन परिसरातील जलस्रोत प्रदूषित होत आहेत. वाढत्या तापमानामुळे जमिनीतील ओलावा कमी होत असून, विषारी बुरशींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता तुषार डावखर आणि अभिषेक भुजबळ या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे पिकांवर नवनवीन रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती निर्माण झाली आहे. तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला माती व पाणी परीक्षणाचा अभाव आणि रासायनिक खतांचा अतिरेक यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होत आहे, असे मत माती परीक्षक रमेश डुंबरे यांनी व्यक्त केले. तर जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांचा, हिरवळीच्या खतांचा वापर वाढवणे आणि संतुलित खत व्यवस्थापन करणे ही काळाची गरज असल्याचे कृषी अधिकारी प्रवीण नंदकुले यांनी स्पष्ट केले आहे.