Agniveer Yojana – लष्करातील भरतीसाठी आणण्यात आलेल्या अग्निवीर योजनेवरून केंद्र सरकारची कोंडी करण्याचे काम विरोधी पक्षांकडून अजूनही सुरूच असून आता हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनीही अग्निवीरांसाठी त्यांच्या मुदत समाप्तीनंतर पोलीस दलात आणि निमलष्करी दलात वेगळा कोटा निर्धारित करण्याची मागणी केली आहे. अग्निवीरांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी त्यांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारीही सरकारने उचलावी अशी मागणी चौटाला यांनी केली. खासगी क्षेत्रातील नौकऱ्यांमध्येही अग्निवीरांना प्राधान्य असले पाहिजे अशीही चौटालांची मागणी आहे. कॉंग्रेसचे नेते आणि रोहटकचे खासदार दीपेंद्र हुडा यांनीही अग्निवीर योजना संपुष्टात आणण्याची मागणी लावून धरली आहे. नो रँक, नो पेन्शन असे स्वरूप असणाऱ्या या योजनेची मागणी ना लष्कराने केली होती, ना या देशातील युवकांनी केली होती ना भाजपच्या घोषणापत्रात त्याचा समावेश होता. असे असताना ही योजना का लागू केली गेली असा सवाल दीपेंद्र हुडा यांनी लोकसभेच्या विशेष सत्रात केलेल्या भाषणात केला होता. दरम्यान, या योजनेने लष्कराच्या तीनही दलांच्या प्रमुखांना चकित केले होते असे भारतीय लष्कराचे माजी प्रमुख मनोज नरवणे यांनीही म्हटले होते. केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार देशासाठी प्राण देणाऱ्या अग्निवीरांना शहीद मानत नाही असा आरोप कॉंग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. कॉंग्रेसचे सरकार आल्यावर योजना संपुष्टात आणली जाईल, कारण ही योजना लष्कर, सैनिक आणि देशभक्तांच्या विरोधात आहे, असेही राहुल यांनी म्हटले होते.