Sanjay Raut : “आदित्य ठाकरेंकडे पक्षाचे नेतृत्व करण्याची क्षमता, तरुण पिढीने धुरा हाती घेतली पाहिजे” – संजय राऊत
आदित्य ठाकरे यांच्यात पक्षाचे नेतृत्व करण्याची पूर्ण क्षमता असून, तरुण पिढीने आता पक्षाची धुरा हाती घेतली पाहिजे, असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

Sanjay Raut – शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतरही पक्ष आजही जमिनीवर तितकाच भक्कम आहे. पक्षाचे तळागाळातील कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत.
तसेच आदित्य ठाकरे यांच्यात पक्षाचे नेतृत्व करण्याची पूर्ण क्षमता असून, तरुण पिढीने आता पक्षाची धुरा हाती घेतली पाहिजे, असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आगामी महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पीटीआयशी संवाद साधला. या आठवड्याच्या सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी शिवसेनेत सहभागी झालेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी त्यांनी पक्षाची साथ सोडलेल्या सहा खासदारांवर पुन्हा सडकून टीका केली. केवळ सत्ता, पैसा आणि स्वतःच्या संरक्षणासाठीच या नेत्यांनी निष्ठा बदलल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
संजय राऊत म्हणाले, तरुण पिढीने आता हळूहळू पक्षाची मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. आम्ही गेली ४० वर्षे सातत्याने पक्षासाठी काम करत आहोत, आणखी किती वर्षे करणार? आता तरुण नेत्यांनी पक्षाची कमान हाती घेणे गरजेचे आहे आणि आदित्य ठाकरे ते सध्या करतच आहेत.
आदित्य ठाकरे येत्या काळात अधिकृतपणे ही जबाबदारी स्वीकारतील. त्यांच्यामध्ये पक्षाचे नेतृत्व करण्याची पूर्ण क्षमता असून, आम्ही सर्व ज्येष्ठ नेते त्यांचे पक्षात मनापासून स्वागत करू.
तसेच पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांचा उल्लेख बंडखोर असा करण्यास राऊत यांनी नकार दिला. पैसा, सत्ता आणि संरक्षणासाठी पक्ष बदलणाऱ्या राजकारण्यांऐवजी भगतसिंग आणि सुखदेव यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांसाठीच हा शब्द राखीव ठेवला पाहिजे, असा युक्तिवाद त्यांनी केला. या खासदारांनी कोट्यवधी रुपयांसाठी स्वतःची विक्री करून घेतली, असा दावाही त्यांनी केला.
ज्या खासदारांनी पक्ष सोडला, त्यांच्या मतदारसंघांमधील मतदार आणि कार्यकर्त्यांना पक्षाची भूमिका थेट समजावून सांगण्यासाठी उद्धव ठाकरे या मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या सहा लोकप्रतिनिधींच्या देहबोलीवरून ते आत्मविश्वासू वाटत होते का, असे विचारले असता राऊत यांनी त्यांना जनतेला सामोरे जाण्याचे आव्हान दिले.
आमच्या दौऱ्यानंतर ते किती आत्मविश्वासू आहेत हे दिसून येईल. जेव्हा विश्वासघातानंतर ‘झेड-प्लस’ सुरक्षा मिळते, तेव्हा आत्मविश्वास वाढतोच, असे ते म्हणाले.






