Sachin WC Squad : सचिनच्या संघातून बुमराह-श्रेयस बाहेर? व्हायरल टीममागील धक्कादायक सत्य आकाश चोप्राने आणलं समोर
Sachin WC Squad : महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्या नावाने व्हायरल झालेल्या २०२७ च्या वर्ल्ड कप भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने पर्दाफाश केला आहे.

Aakash Chopra Busts Fake News On Sachin Tendulkar 2027 ODI World Cup India Squad : दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली रंगणाऱ्या २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाची (2027 ODI World Cup) चर्चा आतापासूनच रंगू लागली आहे. मात्र, या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर दिग्गज क्रिकेटपटूंच्या नावाने अनेक बनावट (Fake) बातम्या आणि भारतीय संघ व्हायरल केले जात आहेत. महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या नावाने व्हायरल झालेल्या २०२७ च्या वर्ल्ड कप भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने (Aakash Chopra) पर्दाफाश केला असून, आपल्या ‘झूठ का डीआरएस’ मालिकेतून अशा खोट्या दाव्यांची जोरदार पोलखोल केली आहे.
बुमराह आणि श्रेयस संघातून गायब; सचिनच्या नावाने व्हायरल झाला फेक संघ!
आकाश चोप्राने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सांगितले की, सचिन तेंडुलकरच्या नावाने एक बनावट संघ फिरवला जात आहे. या व्हायरल यादीत रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, संजू सॅमसन, केएल राहुल, तिलक वर्मा, रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांची नावे आहेत; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांना स्थान दिलेले नाही. यावर नेटकऱ्यांनी सचिन यांच्या निवडीवर टीका करण्यास सुरुवात केली होती. मात्र, चोप्राने स्पष्ट केले की सचिन तेंडुलकर यांनी असा कोणताही संघ निवडलेला नसून ही निव्वळ फेक न्यूज आहे.
विराट कोहलीचे भुवनेश्वर कुमारबद्दलचे कथित वक्तव्यही ठरले खोटे!
Did Sachin Tendulkar Really Pick This Squad for the 2027 ODI World Cup? #JhootKaDRS pic.twitter.com/Vq3V1hH5qh
— Aakash Chopra (@cricketaakash) August 24, 2026
याआधीही एका पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, विराट कोहलीने भुवनेश्वर कुमारची प्रशंसा करत त्याला २०२७ च्या संघात घेण्याची वकिली केली आहे आणि भुवीची संघात निवडही झाली आहे. यावर प्रकाश टाकताना आकाश चोप्रा म्हणाला, “भुवनेश्वर हा अप्रतिम गोलंदाज आहे आणि तो संघात असावा अशी अनेकांची इच्छा असू शकते. याच भावनेचा गैरफायदा घेत ही खोटी बातमी पसरवली गेली. विराटने भुवनेश्वरबाबत असे कोणतेही विधान केलेले नाही आणि बीसीसीआयने अद्याप कोणताही संघ निवडलेला नाही.”
‘झूठ का DRS’ मध्ये पकडले गेले दावे; सोशल मीडियावरील अफवांपासून सावध राहा!
सोशल मीडियावर क्लिक्स मिळवण्यासाठी क्रिकेट दिग्गजांच्या नावाचा गैरवापर केला जात असल्याबद्दल आकाश चोप्राने तीव्र नाराजी व्यक्त केली. “बुमराह आणि श्रेयस यांच्याशिवाय संघ तयार करायचा आणि त्यावर सचिन पाजींचे नाव लावायचे, हे अत्यंत चुकीचे आहे,” असे म्हणत त्याने चाहत्यांना कोणत्याही अधिकृत पुष्टीशिवाय अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.





