Lonikand : वर्ष उलटले… पण भीमा नदीवरील भगदाड जैसे थे; शेतकरी व नागरिकांमध्ये संताप
वेळोवेळी दुरुस्तीबाबत आश्वासने देण्यात आली, टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले; मात्र प्रत्यक्षात परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने नदीकाठावरील गावांमध्ये नाराजी वाढत आहे.

Lonikand : कोरेगाव भीमा – पेरणे या दोन गावांदरम्यान भीमा नदीवर असलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याला मागील पावसाळ्यात पडलेल्या भगदाडाला तब्बल वर्ष उलटत आले तरीही प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम सुरू झाले नसल्याचा आरोप स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
प्रशासनाकडून वेळोवेळी दुरुस्तीबाबत आश्वासने देण्यात आली, टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले; मात्र प्रत्यक्षात परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने नदीकाठावरील गावांमध्ये नाराजी वाढत आहे.
मागील वर्षी झालेल्या मुसळधार व अवकाळी पावसामुळे बंधाऱ्याच्या पेरणे बाजूच्या कडेला मोठे भगदाड पडले होते. त्यावेळी नदीवर वाहून आलेली जलपर्णी, झाडांच्या फांद्या व कचरा वेळेत न काढल्याने पाण्याचा दाब वाढून ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला होता. त्यानंतर नदीकाठावरील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी विद्युत पंप वाहून गेल्याच्याही तक्रारी समोर आल्या होत्या.
घटनेनंतर संबंधित विभागाने युद्धपातळीवर दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू होईल, असेही सांगण्यात आले होते. दरम्यान, ग्रामपंचायतीकडून पत्रव्यवहार, लोकप्रतिनिधींमार्फत पाठपुरावा आणि शेतकऱ्यांकडून वारंवार मागणी करूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळा पुन्हा तोंडावर आला असताना बंधाऱ्याची स्थिती कायम असल्याने नदीकाठावरील शेती, पाणीपुरवठा व्यवस्था आणि परिसरातील उद्योगधंद्यांना धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यंदा पुन्हा अतिवृष्टी झाल्यास मागील वर्षापेक्षा अधिक नुकसान होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, केवळ टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती देऊन उपयोग नाही; प्रत्यक्ष काम सुरू होऊन ते वेळेत पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. अन्यथा प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका पुन्हा शेतकरी आणि नागरिकांनाच बसणार आहे.
“टेंडर झाले, मग काम कधी?”
मागील वर्षभरापासून संबंधित विभागाकडून टेंडर प्रक्रिया झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्ष काम सुरू नसल्याने प्रशासनाने काम सुरू होण्याची तारीख आणि कालमर्यादा जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
पावसाळ्यापूर्वी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
यंदाचा पावसाळा सुरू होण्यापूर्वी भगदाडाची दुरुस्ती, नदीकाठ संरक्षण भिंत आणि बंधाऱ्याची मजबुतीकरणाची कामे तातडीने हाती घ्यावीत, अन्यथा भविष्यात मोठे नुकसान झाल्यास त्याला संबंधित यंत्रणाच जबाबदार राहील, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
प्रशासनाचे अधिकृत म्हणणे अपेक्षित
कामाची सद्यस्थिती, टेंडरची माहिती, निधी उपलब्धता आणि काम सुरू होण्याचा कालावधी याबाबत संबंधित पाटबंधारे विभागाचे अधिकृत स्पष्टीकरण अद्याप स्पष्टपणे समोर आलेले नाही.
“वर्षभरात केवळ आश्वासने; आता प्रत्यक्ष काम दिसले पाहिजे”
मागील पावसाळ्यात भीमा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याला भगदाड पडल्यानंतर संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्याचेही सांगण्यात आले, मात्र प्रत्यक्षात वर्ष उलटूनही काम सुरू झालेले दिसत नाही. पावसाळा पुन्हा तोंडावर आला असून नदीकाठावरील शेतकरी, नागरिक व उद्योगधंदे पुन्हा धोक्यात आले आहेत.
प्रशासनाने आता कागदोपत्री हालचाली न करता प्रत्यक्ष काम सुरू करून कालमर्यादेत पूर्ण करावे. भविष्यात पुन्हा नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांनी स्वीकारावी. तसेच नुकसानग्रस्त भागाचा संयुक्त पाहणी दौरा करून कायमस्वरूपी उपाययोजना जाहीर करावी.
– विवेक शहाजी ढेरंगे, सामाजिक कार्यकर्ते





