आळंदी देवस्थानच्या इतिहासात नवा अध्याय: ॲड. रोहिणी पवार पहिल्या महिला विश्वस्त; ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील, चैतन्य महाराज कबीर यांचीही नियुक्ती

आळंदी: श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी येथील विश्वस्त मंडळावर प्रथमच महिलेची नियुक्ती होऊन इतिहास रचला गेला आहे. ॲड. रोहिणी पवार यांच्यासह ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील आणि ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर (लोंढे) यांची विश्वस्तपदी निवड झाली आहे. गेल्या दीड वर्षापासून रिक्त असलेल्या तीन विश्वस्तपदांच्या जागा भरण्याची प्रक्रिया अखेर पूर्ण झाली असून, या नियुक्तीमुळे आळंदीच्या धार्मिक आणि प्रशासकीय व्यवस्थापनाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. नवीन विश्वस्तांच्या नियुक्तीमुळे लैंगिक समानतेचा संदेश देताना स्थानिक आळंदीकरांचाही प्रतिनिधित्वाचा आग्रह पूर्ण झाला आहे. चैतन्य महाराज आणि पुरूषोत्तम महाराज आळंदीकर नागरिक आहेत.
पहिली महिला विश्वस्त आणि नवे विश्वस्त –
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिराच्या व्यवस्थापनाची प्रमुख संस्था आहे. आतापर्यंत या मंडळावर पुरुषांचीच नियुक्ती होत होती, परंतु ॲड. रोहिणी पवार यांच्या रूपाने प्रथमच महिलेला विश्वस्तपदाची जबाबदारी मिळाली आहे. ॲड. पवार या कायदेतज्ज्ञ असून, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्या परिचित आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे मंदिर व्यवस्थापनात कायदेशीर दृष्टिकोन आणि महिलांचा सहभाग वाढेल.
ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील आणि ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर हे वारकरी संप्रदायातील प्रतिष्ठीत असून, त्यांच्या कीर्तन आणि प्रवचनांनी त्यांना मोठा जनाधार आहे. या तिघांच्या नियुक्तीमुळे विश्वस्त मंडळाला आध्यात्मिक आणि प्रशासकीय बळ मिळेल.
विश्वस्तपदांच्या रिक्त जागांचा इतिहास-
आळंदी देवस्थानच्या सहा विश्वस्तपदांपैकी तीन जागा गेल्या दीड वर्षापासून रिक्त होत्या. नोव्हेंबर 2024 मध्ये ॲड. राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ आणि डॉ. भावार्थ देखणे यांची जिल्हा न्यायालयाकडून नियुक्ती झाली होती, परंतु उर्वरित तीन जागा भरण्यासाठी विलंब होत होता. या जागांसाठी 2 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2024 या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते, ज्यामध्ये 167 इच्छुकांनी अर्ज भरले. मात्र, प्रक्रिया रखडली होती.
या रिक्त जागांमुळे स्थानिक आळंदीकरांमध्ये नाराजी होती. आळंदीकरांना विश्वस्त मंडळात प्रतिनिधित्व न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. स्थानिकांनी रिक्त जागांवर आळंदीतील प्रतिनिधींची नियुक्ती व्हावी, यासाठी आग्रह धरला होता. आता नवीन विश्वस्तांच्या नियुक्तीमुळे स्थानिकांचा हा आग्रह काही प्रमाणात पूर्ण झाला आहे.
सध्याचे विश्वस्त मंडळ –
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या सध्याच्या विश्वस्त मंडळात खालील सदस्यांचा समावेश आहे:
योगी निरंजननाथ (प्रमुख विश्वस्त), ॲड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, ॲड. रोहिणी पवार, ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील, आणि ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर.
पदसिद्ध अध्यक्ष: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे.


