Ashadhi Wari 2026 – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी पंढरपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यंदा माऊलींची पालखी 8 जुलै रोजी आळंदीतील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून 24 जुलै रोजी पंढरपूरमध्ये आगमन होणार आहे. 25 जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा होणार आहे. पंढरपूर येथील नाथ चौकातील माऊली मंदिरात झालेल्या या प्राथमिक बैठकीत पालखी सोहळ्याचे नियोजन, मुक्कामाच्या जागा आणि तारखा यावर चर्चा करण्यात आली. मात्र मुक्कामांच्या ठिकाणांचा व तारखांचा अधिकृत तक्ता अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. तो आळंदी येथे येत्या एकादशीला (दि. 13 एप्रिल) जाहीर केला जाणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख अॅड. राजेंद्र उमाप आणि आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांनी दिली. बैठक पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विश्वस्त योगी निरंजननाथ, चैतन्य महाराज लोंढे, अॅड. रोहिणी पवार, दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब गोसावी, मारुती कोकाटे, रामभाऊ चोपदार यांच्यासह दिंडी प्रमुख उपस्थित होते. यंदा प्रस्थानाची वेळ दुपारी 4 ऐवजी 3 वाजता ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून वारकर्यांना पुढील दिवशी पुण्याकडे प्रस्थानासाठी अधिक वेळ मिळू शकेल. पहिल्या दिवशी पालखीचा मुक्काम आळंदीमध्येच राहणार असून, पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामासाठी जागा निश्चित करण्याबाबत चर्चा सुरू आहे. परंपरेप्रमाणे सोहळ्यात तीन उभे रिंगण आणि चार गोल रिंगण होणार आहेत. सोशल मीडियावरील अफवांपासून सावध! आळंदी देवस्थानकडून मुक्कामाच्या तक्त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसताना सोशल मीडियावर चुकीची वेळापत्रके फिरत आहेत. काही ठिकाणी पुण्यातील मुक्काम केवळ एक दिवस असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे वारकर्यांनी कोणत्याही अप्रमाणित माहितीकडे दुर्लक्ष करून अधिकृत तक्ता जाहीर झाल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन देवस्थानकडून करण्यात आले आहे.