Mauli Palkhi Sohala – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ठिकाण बदलू नका, अशी मागणी करत, आम्ही तेथे असलेल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन निवडुंगा विठोबा देवस्थान संस्थानचे विश्वस्त आणि नगरसेवक विशाल धनवडे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा समितीला केले आहे. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दरवर्षी मुक्कामी येते. हे ठिकाण अत्यंत अडचणीचे ठरत आहे. सुरक्षा आणि एकूणच गर्दीच्या दृष्टीने ते सोयीचे नाही. या कारणास्तव पालखी एसपी काॅलेजच्या किंवा टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानात मुक्कामी आणावी का, याविषयी पालखी सोहळा समितीत विचार सुरू आहे. त्याला धनवडे यांनी विरोध केला आहे. ठिकाण बदलण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे समजले. हा निर्णय ऐकून आम्हा सर्व वारकरी भाविकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे, असे धनवडे यावर म्हणाले. पालखी सोहळा हा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून, तो आमच्या श्रद्धेचा, परंपरेचा आणि भावनिक नात्याचा भाग आहे. ३५० वर्षे भवानी पेठ येथे मुक्कामी असणारा हा पालखी सोहळा आमच्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. ठिकाण बदलल्यास ३५० वर्षाची परंपरा खंडित होऊन परंपरेला धक्का बसेल, असे धनवडे यांनी समितीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पालखी सोहळ्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेऊ नये. सोहळा पूर्वीप्रमाणेच ठरलेल्या ठिकाणी आयोजित करावा, असे निवेदनात म्हटले आहे. जेथे पालखीचा मुक्काम असतो, त्याठिकाणी गर्दी होते, ही वस्तुस्थिती आहे. परंतु ३५० वर्षांची पालखी मुक्कामाची परंपरा आहे. भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याबाबत पोलिसांशी बोलून त्या दूर करण्याचा निर्णय घेतला जाईल. विशाल धनवडे, नगरसेवक, विश्वस्त, निवडुंगा विठोबा देवस्थान “वाढता वारकरी परिवार, दर्शनासाठी येणारे भाविक, मुक्कामी असणारे वारकरी यांच्या दृष्टीकोनातून तो भाग कमी पडत आहे. त्यामुळे सोहळा समितीचा यादृष्टीने विचार सुरू आहे. अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. आता या विषयावर प्राथमिक चर्चा सुरू आहे. सोहळ्यातही भाविकांची, वारकऱ्यांची, दर्शन घेणाऱ्यांची संख्या खूपच वाढल्याने हा विचार सुरू आहे.” – डॉ. भावार्थ देखणे, प्रमुख विश्वस्त, आळंदी देवस्थान