पिंपरी (प्रतिनिधी) – चिखली-पिंपरी बीआरटी स्पाइन रोडपर्यंत विस्तृत व स्वतंत्र आहे. परंतु स्पाइन रोडवरील उड्डाणपूल उतरून कुदळवाडीमध्ये प्रवेश करता बीआरटी मार्ग केवळ नावालाच राहिला आहे. त्यामुळे पीएमपी व इतर वाहनाचालकांना येथील अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
रस्ता व पदपथ अनधिकृत पार्किंगचे ठिकाण बनले आहे. तर काही ठिकाणी पदपथ व्यावसायिकांनी गिळंकृत केले आहेत. याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
पिंपरी-चिखली बीआरटी मार्गावर दिवसरात्र वाहनांची गर्दी असते. कुदळवाडी परिसरात अनेक लहान मोठे लघुउद्योग व भंगार व्यावसायिकांची गोडावने असल्याने कामगार व नोकरदार तसेच स्थानिक नागरिक व व्यावसायिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे वाहनांची संख्या मोठी आहे. परंतु रस्ता अरुंद असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना दररोज करावा लागत आहे.
कुदळवाडी येथे यादवनगर, पवार वस्ती भागात स्थानिक व्यावसायिकांनी पदपथावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या भागात कायम वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. या मार्गावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी नारिकांकडून होत आहे. परंतु फ आणि क क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमण विरोधी पथक का कारवाई करत नाही याबाबत नागरिकांमध्ये चर्चा आहे.
चिखली गावात तसेच मोई फाट्यापासून पुढे पिंपरीकडे जाणार्या रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांनी पदपथावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या मार्गाला पदपथ आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. बहुतांश व्यावसायिकांनी पदपथ तर गिळंकृत केला आहेच परंतु रस्त्यावर देखील टेबल, गाड्या लावून इतर वाहनांना रहदारीस अडथळा ठरत आहे. त्यामुळे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या अतिक्रमण विरोधी पथकाने येथील अतिक्रमणांवर कारवाई करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
चार चाकी गाड्यांची अॅक्सेसरीजची दुकाने या मार्गावर मोठ्या प्रमाणात आहेत. येथे शहरातील बहुतांश कारमालक आपल्या गाड्यांना अॅक्सेसरीज बसविण्यासाठी येतात. सकाळी दहापासून सायंकाळी सात वाजतापर्यंत वाहनांची मोठी गर्दी असते. ही वाहने रस्त्यातच उभा करून व्यावसायिक कामे करत असल्याने मुख्य रस्ता वाहतुकीसाठी अरुंद होत असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथील पदपथ व रस्त्यावर अतिक्रमण करणार्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे.
अवजड वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा
कुदळवाडी परिसरात अनेक लहान मोठे व्यवसाय असल्याने दिवसा व रात्री अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर येथे ये-जा करतात. भंगार व्यावसायिक व इतर व्यावसायिकांची येथे गोडाऊन आहेत. परंतु जाण्यासाठी रस्ता अरुंद असल्याने बीआरटी मार्गावरच वाहने ओळविण्यासाठी कसरत सुरू असते. परिणामी बीआरटी मार्ग वाहतुकीस अडवला गेल्याने वाहनांच्या रांगा लागत आहे. बरीच अवजड वाहने रस्त्यात पार्क केली जातात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
पदपथावर व्यावसायिकांची दादागिरी
महापालिकेने लाखो रुपये खर्च करून पादचार्यांसाठी तयार केलेले पदपथ व्यावसायिकांनी गिळंकृत केल्याने पादचार्यांना मुख्य रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. एखाद्या पादचार्यांनी व्यावसायिकांना अतिक्रमण हटविण्याची भाषा केली तर दादागिरी केली जात आहे. त्यामुळे पादचार्यांसाठी असलेला पदपथ मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.