नवी दिल्ली – आशिया चषक 2023 चा अंतिम सामना (IND vs SL) रविवारी कोलंबोतील आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. उद्या रोहितची (Rohit Sharma) पलटण 8 व्यांदा आशिया चॅम्पियन (Asia Cup 2023) बनण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर दासुन शनाकाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा संघ विजेतेपद राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.मात्र, कोलंबोतील अंतिम सामन्याच्या दिवशी पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत विजेतेपदाचा सामना पावसामुळे वाहून गेला, तर विजयी संघ कसा ठरवला जाणार, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. फायनलमध्ये जर पाऊस आला तर विजेता नेमका कसा ठरणार त्याबाबतचे नेमके काय नियम आहेत ते आपण जाणून घेणार आहोत.
भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील अंतिम सामन्याच्या दिवशी पावसाची 80 टक्के शक्यता आहे. म्हणजेच सुपर-4 फेरीप्रमाणेच विजेतेपदाच्या सामन्यातही पाऊस येत-जात राहणार आहे. हे लक्षात घेऊन अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. म्हणजे रविवारी पावसामुळे अंतिम सामना पूर्ण झाला नाही, तर सोमवार सामना पूर्ण केला जाईल.
रिझर्व्ह डेच्या दिवशीही पाऊस ?
आता रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी कोलंबोमध्ये मुसळधार पाऊस पडला, तर विजेता कसा ठरणार? राखीव दिवशीही, दिवसभर पाऊस पडला आणि एकही चेंडू खेळला गेला नाही, तर दोन्ही संघ ट्रॉफी शेअर करतील.नियमांनुसार, अंतिम सामन्याचा निकाल मिळविण्यासाठी, दोन्ही संघांना किमान 20-20 षटके खेळणे आवश्यक आहे.
खेळपट्टी कशी आहे सध्या?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया चषक 2023 च्या विजेतेपदाचा सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. कोलंबोच्या या मैदानावर बॅट्समन्सचे वर्चस्व राहिलेले आहे. चेंडू बॅटवर खूप चांगल्या पद्धतीने येतो आणि धावा काढताना फारशी अडचण येत नाही. मात्र, दुसऱ्या डावात खेळपट्टी निश्चितच थोडी मंदावते. फलंदाजांसोबतच खेळपट्टी फिरकीपटूंनाही खूप मदत करते.